महसूल खात्याचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: January 7, 2017 01:37 IST2017-01-07T01:37:10+5:302017-01-07T01:37:22+5:30
महसूल खात्याचे काम बंद आंदोलन

महसूल खात्याचे काम बंद आंदोलन
नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या जमिनींच्या प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यासह महसूल खात्यातील अकरा अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नोंदविलेल्या गुन्ह्यामुळे महसूल खात्यात तीव्र संतापाची लाट उसळून त्याचे परिणाम शुक्रवारी शासकीय कामकाजावर झाला. जिल्ह्यातील समस्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, या साऱ्या प्रकरणाचा चुकीचा अर्थ काढून फिर्याद दाखल करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याविरुद्धच कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी सायंकाळी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन प्रांत अधिकारी वासंती माळी, तहसीलदार सुदाम महाजन, पुनम दंडिले यांच्यासह २३ जणांविरुद्ध शासनाचे नुकसान करणे व रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सरळ सरळ महसूल खात्याच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात असून, त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी महासंघ, राज्य नायब तहसीलदार, तहसीलदार संघटना, राज्य तलाठी संघटना, राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, राज्य कोतवाल संघटना अशा सर्वांनी एकत्र येत लेखणी बंद आंदोलन पुकारले त्यामुळे दिवसभर महसूल खात्याचे कामकाज ठप्प झाले. या संदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् व विभागीय आयुक्तएकनाथ डवले यांची भेट घेऊन या साऱ्या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडली, शिवाय हा सारा प्रकार महसूल खात्याच्या अर्धन्यायिक बाबीशी निगडीत असताना व त्यासंदर्भात अपर आयुक्त तसेच उच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने संपूर्ण प्रकरणाचा विपर्यास अर्थ काढला. या प्रकरणात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक लाभापोटी कोणतीही कृती केली नसल्याचा दावाही करण्यात आला असून, सदरची फिर्याद बिनशर्त मागे घेण्यात यावी तसेच वस्तुस्थितीचा विपर्यास करून फिर्याद दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी त्यासाठी न्यायिक रिट याचिकाही दाखल करण्याचे तसेच फिर्यादीविरुद्ध प्रति फिर्याददेखील दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, विठ्ठल सोनवणे, महेश पाटील, सुरेखा चव्हाण, प्रवीण महाजन, राहुल पाटील, प्रज्ञा बढे, सरिता नरके, दीपमाला चौरे आदिंच्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासकीय बैठकीवर बहिष्कार
महसूल अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेच्या आढावा बैठकीला फटका बसला. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांत, तहसीलदार यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून नांदगावच्या घटनेचा निषेध नोंदविला, त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही बैठक घ्यावी लागली. शनिवार (दि.७)पासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.