‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
By Admin | Updated: June 27, 2014 00:10 IST2014-06-26T21:38:09+5:302014-06-27T00:10:30+5:30
‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

‘त्या’ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव
सिन्नर : तालुक्यातील डुबेरेवाडी येथील सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या दहावीच्या ११ विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाने राखून ठेवला आहे. संस्थाचालकाने सदर विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क व आवेदनपत्र न भरल्यामुळे विद्यार्थी निकालपत्र मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. संस्थाचालक, शिक्षण विभाग व परीक्षा मंडळाच्या भूमिकेमुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
डुबेरेवाडी येथे सिद्धेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. सदर शाळेच्या मान्यतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. या शाळेतील दहावीच्या ११ विद्यार्थ्यांना शाळा संकेतांक नसल्याने दहावीच्या परीक्षेचे फॉर्म भरले गेले नव्हते. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालक ठाणगाव येथील परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडे हॉल तिकीट नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर व संस्थाचालकाने या विद्यार्थ्यांची दंडासह परीक्षा फी व आवेदनपत्र भरून देण्याची तयारी दर्शविल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण मंडळाने त्यांना परीक्षेला बसू देण्याची परवानगी दिली होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी इमर्जन्सी बारकोड चिटकवून पेपर दिले होते.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थाचालकाने परीक्षा फी व दंडापोटी असलेल्या रकमेतून सुमारे ७० हजार रुपये भरले होते. उर्वरित दंड दुसऱ्या दिवशी भरण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, उर्वरित रक्कम भरण्यासाठी सदर संस्थाचालकांशी संपर्क साधूनही त्याने पैसे भरण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर त्याच्यासोबत वारंवार संपर्क साधूनही त्याने दंडासह परीक्षा फी तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण करून दिली नाही.
त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला होता. त्यात या विद्यार्थ्यांचा निकाल नव्हता. गुरुवार (दि. २६) रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे शाळांतून वाटप
सुरू झाले. मात्र या ११
विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आल्याने त्यांचे गुणपत्रक हातात मिळाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी
आहे. (वार्ताहर)