जिल्हाभरातून प्रतिसाद
By Admin | Updated: September 24, 2016 23:48 IST2016-09-24T23:48:23+5:302016-09-24T23:48:50+5:30
विविध ठिकाणांहून आलेल्या समाजबांधवांनी मोकळ्या केल्या भावना

जिल्हाभरातून प्रतिसाद
नाशिक : कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना तत्काळ कडक शासन व्हावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शनिवारी (दि. २४) नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजातर्फे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजबांधव शहरात दाखल झाले होते.
या मोर्चासाठी दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील राजेश पगारे, नितीन मोरे, किरण पाचरणे, महेंद्र मोरे, सुनील पाचरणे, संदीप मोरे हे सहभागी झाले होते. अवनखेड येथून आलेल्या नागरिकांनी पंचवटी येथील मार्केट यार्ड येथे वाहने लावून या मोर्चात आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच निफाड येथील पिंपळस येथील मराठा समाज बांधवांनी शुक्रवारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात केली होती. मागील काही दिवसांमध्ये मार्केट अनेक दिवस बंद होते. या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला माल विक्रीसाठी नेला असताना मालाची विक्री होऊ शकली नाही आणि हा माल नाशवंत असल्याने अक्षरश: फेकून द्यावा लागला. मार्केट बंद काळात नुकसानभरपाई मिळण्याची घोषणा जरी सरकारने केली असली तरी मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांना पावती दाखवल्यावरच नुकसानभरपाई मिळेल, असे सांगण्यात आले, परंतु मार्केट बंद असल्याने पावत्या कशा उपलब्ध होतील, असा सवाल शेतकऱ्यांनी मांडून आपली जाहीर नाराजी यावेळी प्रगट केली. या मोर्चासाठी सवंदगाव येथील दिनकर सूर्यवंशी, धनराज सूर्यवंशी, सीताराम शेवाळे, अशोक शेवाळे, प्रकाश शेवाळे, गोविंद शेवाळे, बापू बागुल आदि शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
पिंपळस येथील रावसाहेब आहेर यांनी मराठा समाजातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मागण्यांबरोबरच शेतकऱ्यांना सरकारतर्फे योग्य न्याय मिळायला हवा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त करत शेत मालाला योग्य भाव न मिळणे, शेतकऱ्याने केलेली गुंतवणूक तसेच शेतमजुरांना देण्यात येणाऱ्या रोजगाराचीदेखील किंमत वसूल होत नाही, तसेच शेतकऱ्यांना अनुदान तुटपुंजे असल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी यावेळी केली.