‘तारांगण’ योजनेला प्रतिसाद
By Admin | Updated: August 20, 2015 00:16 IST2015-08-20T00:15:29+5:302015-08-20T00:16:01+5:30
चार शो आरक्षित : मुलांसाठी मिळणार सवलत; मुंबई-पुण्याचे प्रायोजक

‘तारांगण’ योजनेला प्रतिसाद
नाशिक : महापालिकेच्या तारांगण प्रकल्पाला पुनर्जीवित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी आखलेल्या योजनेला थेट मुंबई-पुण्यातील प्रायोजकांकडून प्रतिसाद लाभत असून, आतापर्यंत चार शो आरक्षित झाले आहेत. १६ वर्षांखालील मुलांसाठी सवलत देण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा ‘तारांगण’ प्रकल्प बंद स्थितीत पडून आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभारलेल्या या तारांगण प्रकल्पाकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याने महापालिकेला त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. दरम्यान, महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर जीवनकुमार सोनवणे यांनी आधी कालिदास कलामंदिराच्या समस्यांकडे लक्ष दिले. त्यानंतर बंद स्थितीत असलेल्या ‘तारांगण’ प्रकल्पाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून योजना आखली. या योजनेनुसार, शहरातील कुणाही व्यक्तीचा वाढदिवस असेल त्याने तारांगणचे शो प्रायोजित करावेत. एका शोसाठी ५ हजार रुपये मोजल्यास अथवा दिवसभरातील चार शोचे २० हजार रुपये दिल्यास दिवसाला सुमारे ४०० विद्यार्थी तारांगणचा आस्वाद घेऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना सदर शो दाखविले जाणार असून, त्यांची निवड महापालिका करणार आहे. १६ वर्षांखालील मुलांसाठी सवलत योजना असून जे लोक आपल्या वाढदिवशी तारांगणचे शो प्रायोजित करतील त्यांची नावे तारांगणमधील इमारतीत डिस्प्ले केली जाणार आहेत. महापालिकेच्या या योजनेला मुंबई-पुण्यातील लोकांनी प्रतिसाद दिला असून, दि. २२ रोजी अविनाश शिरोडे (नाशिक), दि. २३ रोजी सोमनाथ पाटील (मुंबई), दि. २९ रोजी सुनील साबळे आणि दि. १ सप्टेंबर रोजी श्रीमती पवित्रा तुषार पगार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शो प्रायोजित करत आरक्षित केले आहेत. (प्रतिनिधी)