आरक्षणामुळे हिरमोड!
By Admin | Updated: January 8, 2017 00:44 IST2017-01-08T00:44:39+5:302017-01-08T00:44:52+5:30
भालूर गट : राजकीय वातावरण तापू लागले

आरक्षणामुळे हिरमोड!
गिरीश जोशी मनमाड
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारीबाबत राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे, तर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या मातब्बरांचा आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालूर गटामध्ये भालूर व पानेवाडी हे दोन गण येतात. यावेळी तालुक्यात जातेगाव या नवीन गटाची निर्मिती झाल्याने भालूर गटातील काही गावे कमी करण्यात आली आहे. भालूर गट हा अनुसूचित जाती महिला या उमेदवारासाठी राखीव असून, भालूर गण हा अनुसूचित जमाती व पानेवाडी गण हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव आहे. भालूर गटातून जामदरी व नवीन पांझण ही गावे कमी करून साकोरा गटाला जोडण्यात आली आहे, तर लक्ष्मीनगर, वडाळी खु, वडाळी बु।। ही गावे जातेगाव गटाला जोडण्यात आली आहेत.
अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते; मात्र या सर्वांचाच आरक्षणामुळे भ्रमनिरास झालेला पहावयास मिळाला. भालूर गट हा अनुसूचित जाती महिंला गटासाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. यामुळे सर्वच पक्षांनी महिलेची शोधाशोध सुरू केली आहे. या आरक्षणामुळे मातब्बर नेत्यांनी शांत राहणे पसंत केले आहे.
अनेक वर्षांपासून भालूर गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीच्या वेळी तालुक्यात भुजबळ यांचे वर्चस्व असले तरी या गटात व गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्या वेळेस शिवसेनेचे अशोक जाधव व राष्ट्रवादीचे अनिल खुरसणे यांच्यामध्ये लढत होऊन जाधव विजयी झाले होते. गणामध्ये सेनेच्या भीमाताई पाटील व राष्ट्रवादीच्या निर्मला इनामदार यांच्यात लढत होऊन पाटील विजयी झाल्या होत्या. पानेवाडी गणात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुरक्षा केसकर यांनी तत्कालीन पं. स. सदस्य बाळासाहेब अव्हाड यांच्या सौभाग्यवती विमलबाई अव्हाड यांचा पराभव केला होता.
आरक्षणामुळे यंदाच्या निवडणुकीत गटाची व गणाची स्थिती बदली आहे. विद्यामान सदस्य उमेदवारी करण्याच्या मनस्थिीतीत असले तरी त्यांना जागेची तडजोड करावी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विद्यमान जि. प. सदस्य अशोक जाधव हे भालूर गणातून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पं. स. सदस्य भीमाताई पाटील यांना नवीन गणाचा शोध घ्यावा लागणार आहे. पानेवाडी गणाच्या सदस्य सुरक्षा केसकर यांचा पानेवाडी गण सर्वसाधारण असल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. १९७९ साली कै. बाबूराव हाके यांच्यानंतर प्रथमच केसकर यांच्या रूपाने पंचायत समितीवर धनगर समाजाला सभापती व उपसभापतिपदाचा मान मिळाला आहे.
या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खलबते सुरू केली आहेत. आपल्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढण्यासाठीची पूर्ण तयारी झाली असली तरी सन्मानाची वागणूक मिळाल्यास समविचारी पक्षांशी युती करण्याची भाषा प्रत्येक पक्षाच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. सध्याच्या विद्यमान सदस्यांबरोबरच इतरही नवीन उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाबरोबर युती होईल वा आघाडी होईल, याबाबत परिसरात चर्चा झडत आहेत. याबाबतीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह अन्य पक्षांचे नेते कामाला लागले आहेत.
आपल्याला मानणारा कोण, पक्षाला मानणारा कोण याची आकडेमोड सुरू झाली आहे. गेल्या निवडणुकीवर भुजबळांचा प्रभाव दिसून आला असला तरी यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलला भाजपा स्थानिक पातळीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.