रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या
By Admin | Updated: August 5, 2014 01:53 IST2014-08-05T01:30:58+5:302014-08-05T01:53:15+5:30
रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या

रहिवाशांचा आज पालिकेसमोर ठिय्या
नाशिक : जुन्या नाशकातील काझी गढीच्या धोकेदायक काठालगतच्या दोनशे कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार असून, गढीचा भुसभुशीत झालेला भाग ढासळत चालला आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवासी संतप्त झाले असून, आज सकाळी महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सांगितले.
धोकेदायक झालेल्या काझी गढीचा काही भाग गेल्या सहा दिवसांपूर्वी कोसळल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून स्थलांतर करण्याचा तगादा लावला जात असून, काठालगतच्या कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेकडून कमी घरे दिली जात असून, जुन्या घरांच्या सुरक्षेबाबत कोणतीही लेखी हमी मनपा देण्यास तयार नसून गढीला संरक्षक भिंत बांधून देण्याबाबतही प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे स्थलांतर करून आमच्यावर बेघर होण्याची वेळ येईल; त्यापेक्षा मृत्यू परवडला, अशा भावना येथील महिलांनी बोलून दाखविल्या.
दरम्यान, गेल्या रविवारप्रमाणे आजदेखील येथील काझी गढी रहिवाशांनी धोकेदायक झालेल्या गढीच्या काठावरच सकाळपासून भर पावसात ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आजदेखील महापौर किंवा अन्य अधिकारी गढीवर फिरकले नसल्यामुळे मनपा प्रशासन आम्हा रहिवाशांची मृत्यूच्या दरीत जाण्याची वाट बघत आहे, त्यांना येथील रहिवाशांच्या जिवाची पर्वा नाही, असा गंभीर आरोप सुरेश कुमावत, कैलास काथवटे, दशरथ कदम, पंकज रहाणे, संजय शिंदे, चंद्रकला नागपुरे, वैशाली खोडके, सुलोचना वारे, रंजना काथवटे, संगीता जाधव यांच्यासह इतर महिलांनी केला आहे. (प्रतिनिधी)