स्थलांतराऐवजी रहिवाशांचा ठिय्या
By Admin | Updated: August 4, 2014 02:11 IST2014-08-04T01:58:09+5:302014-08-04T02:11:23+5:30
स्थलांतराऐवजी रहिवाशांचा ठिय्या

स्थलांतराऐवजी रहिवाशांचा ठिय्या
नाशिक : गेल्या शनिवारपासून महापौरांनी आश्वासन देऊनदेखील गढीवर हजेरी न लावल्यामुळे येथील संतप्त झालेल्या रहिवाशांनी आज सकाळी स्थानिक नगरसेवकांसोबत धोकेदायक झालेल्या गढीच्या काठावरच ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. संरक्षक भिंत बांधण्याची व जुन्या घरांच्या सुरक्षेची लेखी हमी जोपर्यंत दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही स्थलांतरित होणार नाही, असा पवित्रा गढीवरील संतप्त रहिवाशांनी घेतल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिल महाजन यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाला व त्यांनी गढीवरून काढता पाय घेतला. दुपारी चार वाजेपर्यंत गढीवरील आबालवृद्धांचे ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी सुरूच होती.
शहरात गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे चार दिवसांपूर्वी गढीचा धोकेदायक झालेला काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. तसेच माळीण गावावर कोसळलेल्या डोंगराच्या घटनेची धास्ती घेत महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी तत्काळ हालचाली गतिमान केल्या. दरम्यान, स्थानिक नगरसेवक विनायक खैरे यांनी ‘रामायण’वर महापौर अॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते यांच्यासोबत दीड ते दोन तास काझी गढीच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली, तसेच गाडगे महाराज धर्मशाळेच्या विश्वस्तांबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा के ल्यानंतर विश्वस्त मंडळाने पंधरा खोल्या उपलब्ध करून देण्याचे क बूल केले. तसेच लगतच्या महापालिकेच्या दवाखान्यात, शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी प्रशासनाकडून चालविली जात होती; मात्र रहिवाशांनी गढीवरून स्थलांतरित होण्यास स्पष्ट नकार दिला. (प्रतिनिधी)