वीज वितरण अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन
By Admin | Updated: September 6, 2016 22:51 IST2016-09-06T22:50:25+5:302016-09-06T22:51:58+5:30
शेतकरी संघटनेची गांधीगिरी : खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

वीज वितरण अधिकाऱ्याच्या खुर्चीला निवेदन
येवला : खंडित वीजपुरवठा, खराब झालेले विद्युत जनित्र, लोंबलेल्या वीजतारा, बिलवसुलीवरून विद्युत रोहित्रासाठी अडवणूक यासारख्या समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी संघटना नेते संतुपाटील झांबरे, शेतकऱ्यांसह वीज मंडळाच्या कार्यालयात गेले असता वीज मंडळाचे सक्षम अधिकारी कार्यालयात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंत्याच्या खुर्चीला निवेदन चिटकविले.
दरम्यान मनमाडचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली हे बघून कार्यकारी अभियंता यांनी प्रतिसाद दिला आणि कार्यालयात उपस्थित असलेले येवला शहर विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांना फोनवरून शेतकरी संघटनेशी चर्चा करून तीन दिवसात शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी पत्र देण्यास सांगितले त्याप्रमाणे शेतकरी संघटनेला पत्र देण्यात आले.
शेतकरी संघटनेच्या निवेदनात गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहे, काहींनी आपली जीवनयात्रा संपवली. पाऊस नसल्याने कित्येक शेतकऱ्यांनी विजेच्या पंपाचे बटनसुद्धा दाबले नाही मग बिल तयार कसे झाले? असा प्रश्न उपस्थित केला.
यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर मोठ्या प्रमाणावर खर्च करून रब्बीची मका, सोयाबीन, बाजरी, तूर यासारखी पिके उभी केली परंतु पीक ऐन भरात असताना पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हैराण झाला असून या पिकांना पाणी न मिळाल्यास हातचे पीक जाण्याचे संकट दिसत असल्याने पाऊस आणि काही ठिकाणी पाटामुळे विहिरीत जे पाणी आहे ते द्यायचे तर वीजमंडळाचा हा खेळ, विहिरीत पाणी दिसत असून पिकाला पाणी देते येईना, अशी परिस्थिती वीज मंडळाने तयार केली आहे.
वीजपुरवठा खंडित राहणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी वीजबिलाची सक्ती करणे, मेंटेनन्सची कामे करणे यासाठी आज शेतकरी संघटना नेते, संतुपाटील झांबरे, महिला आघाडीच्या संध्या पगारे, बाळासाहेब गायकवाड, प्रभाकर भोसले, भीमराज गायकवाड, चंद्रभान जाधव, कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, नितीन इंगळे, पांडुरंग गायकवाड, बबन झांबरे, संतोष कदम, रायगड ग्रुपचे नारायण गायकवाड, अरविंदगिरी गोसावींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.(वार्ताहर)