ट्रँकर सुरू झाल्याने खर्डेवासीयांना दिलासा
By Admin | Updated: July 5, 2014 00:22 IST2014-07-04T22:02:25+5:302014-07-05T00:22:50+5:30
ट्रँकर सुरू झाल्याने खर्डेवासीयांना दिलासा

ट्रँकर सुरू झाल्याने खर्डेवासीयांना दिलासा
देवळा : तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या खर्डे गावातील ग्रामस्थ व महिलांना मंगळवारपासून पाण्याचा टँकर सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. खर्डे गावाचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी शासनाने दोन विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अधिग्रहीत केलेल्या दोन्ही विहिरींना सुरुवातीला बऱ्यापैकी पाणी होते. जून महिन्याच्या पूर्वार्धातच या विहिरींनी तळ गाठल्याने खर्डे गावातील नागरिकांना गत दोन आठवड्यांपासून भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. गतवर्षी खर्डा ग्रामपंचायतीने केलेल्या बोअरवेलला जे थोडेफार पाणी लागले होते त्यावरच सर्व गाव अवलंबून होते. परंतु गावाच्या लोकसंख्येचा विचार करता बोअरवेलचे अल्प पाणी पाहता गावासाठी ते पाणी पुरेसे नव्हते. यामुळे रात्रंदिवस या बोअरवेलवर महिलांची झुंबड उडे व उभे राहूनही पाणी मिळत नसल्याने पाण्यावरून वादविवाद व्हायचे.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जगताप व नागरिकांनी तहसीलदार शर्मिला भोसले यांच्याकडे खर्डा गावातील पाणीटंचाईची समस्या मांडली व टँकर सुरू करण्याची मागणी केली. तहसीलदारांनी टँकरला मंजुरी दिल्याने मंगळवारपासून खर्डा येथे पाण्याचा टँकर नियमितपणे सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तीन वर्षांपूर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम सुरू आहे. योजनेची किंमत ५८ लाख रुपये असून, योजना अपूर्णावस्थेत आहे. दीड वर्षापासून संबंधित ठेकेदाराने उर्वरित काम सुरूकेलेले नाही तसेच कामाचा दर्जा निकृष्ट असून, सदोष नियोजनामुळे योजना रखडल्याची नागरिकांची तक्रार आहे. (वार्ताहर)