नुकतीच टंचाई अन् नुसताच आढाव्यांचा आगडोंब

By Admin | Updated: June 30, 2014 00:51 IST2014-06-30T00:50:36+5:302014-06-30T00:51:45+5:30

नुकतीच टंचाई अन् नुसताच आढाव्यांचा आगडोंब

Recently the scarcity and the recent reviews | नुकतीच टंचाई अन् नुसताच आढाव्यांचा आगडोंब

नुकतीच टंचाई अन् नुसताच आढाव्यांचा आगडोंब

 

गणेश धुरी
ंतसे पाहिले तर एकाच रात्रीतून किंवा एकाच दिवसात पाण्याची भीषण टंचाई उद्भवलेली नाही. तशी हवामान खात्याने पूर्वकल्पना दिलेली असतानाही आणि लहरी मान्सूनची सवय अंगवळणी पडलेली असतानाही गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणेने टंचाईचे सावट कसे भीषण आहे आणि पाणीटंचाईचा प्रश्न किती आणि कसा बिकट होत जाणार आहे, याचे चित्र रंगविण्यास एव्हाना सुरुवात केली आहे. आताशा कुठे जून संपत आलेला असताना टंचाईच्या नावाने शिमगा करून आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेला टंचाईचे कारण देत ‘कपाती’ची भीती दाखविणे म्हणजे मेलेल्याला मृत्यूचे भय दाखविण्यासारखेच नव्हे काय. टंचाई जाणवते आहे, हे खरेच आहे; मात्र जानेवारीपासून मेपर्यंत याच जनतेने ‘याचि देही याचि डोळा’ मराठवाडा काय अन् खान्देश काय, बर्फवृष्टीने काश्मीर झाल्याची घटनाही अनुभवली आहे. म्हणजेच निसर्ग लहरी आणि त्यात मान्सून, तर आणखीनच लहरी. तरीही हवामान खात्याने यापूर्वीच कल्पना देऊन पाऊस सरासरीच्या ८० ते ९३ टक्क्यांपर्यंत राहील, अशी हाकाटी आधीच पिटून ठेवली आहे. त्यामुळे जनतेने इतके घाबरून जायचे कारण नाही. थोड्या उशिराने का होईना, पावसाला सुरुवात होणार हे नक्की. मात्र त्यालाही इव्हेन्टचे स्वरूप देण्याचा जो काही प्रकार यंत्रणा करू पाहत आहे, तो तर लहरी मान्सूनपेक्षा अधिक भयानक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १०० च्या ४० टक्के पाणीसाठा असल्याने अजूनही धरणातून निफाड-येवल्यासाठी आवर्तन सोडण्यात येत आहे. त्यामुळे थोेड्याफार प्रमाणात सिंचनाचा आणि मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत आहे. मात्र जुलैला पाऊस आलाच नाही, धरणे कोरडीठाक पडली आहेत, आता रेल्वेने पाणी आणावे लागणार, अशा ‘धारणा’ आतापासूनच सरकारी यंत्रणा करू पाहत आहेत. टंचाई जाणवते आहे, पाण्याचा प्रश्न काही तालुक्यांत गंभीर बनला आहे, पाणी जपून वापरण्यास सांगण्यात आले आहे, इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. मात्र पाणीसाठा अमुक एका तारखेपर्यंत पुरवा, जादा पाणी टॅँकर सुरू करावे लागतील, पाणीकपात तत्काळ सुरू करा, ही जी काही मुक्ताफळे उधळली जात आहेत, त्यामुळे जनतेत घबराट निर्माण होईल, असे काही वातावरण तयार करणे तसे जनतेच्या दृष्टीने कधीही चांगले नाहीच.
जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक तेथे पाण्याची सोय करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, हे तर मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाईचा आढावा घेणे आणि त्यात थोड्या बहुत प्रमाणात यंत्रणेला सूचना देणे तसे ओघाने आलेच. मात्र टंचाईच्या नावाने जिल्हाभरात मोर्चे आणि आढावा बैठकांचा जो काही फार्स सुरू आहे, मुख्यालय न सोडण्याचे आदेश देणे, बैठकांना उपस्थिती बंधनकारक करणे यांसारख्या प्रकारांमुळे जनतेचे प्रश्न सुटण्यापेक्षा ते वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण रावसाहेब आणि भाऊसाहेबांना कोण्या एका अधिकाऱ्यांचेच म्हणणे चालत असेल आणि अशा गावोगावी घेतलेल्या आढावा बैठकातून अन्य अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी त्याच अधिकाऱ्यांना चुचकारणे तसे या रावसाहेब आणि भाऊसाहेबांना चालेलच असेही नाही. त्यामुळे सुरू असलेल्या योजना किंवा कामे रखडण्याचीच शक्यता अधिक असते. पाणीटंचाईवर सावध व तितक्याच गंभीरतेने पाहणे योग्य, मात्र त्यासाठी निरर्थक गळा काढणे आणि जनतेला घाबरवणे म्हणजे कोल्हेकुईसारखाच प्रकार म्हणावा लागेल. जून संपत आला मात्र जुलैही कोरडा जाईलच, ही भीती टंचाईपेक्षा अधिक भयानक ठरू पाहत आहे. काळजी घेणे चांगले मात्र अनाठायी काळजी करणे तसे शरीराला आणि समाजालाही घातकच ठरू शकते. त्यामुळे टंचाईचे योग्य नियोजन आणि सावध उपाययोजना करणे कधीही चांगलेच नव्हे काय.

Web Title: Recently the scarcity and the recent reviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.