रामसृष्टी उद्यानाची झाली दुरवस्था
By Admin | Updated: September 20, 2015 23:07 IST2015-09-20T23:07:08+5:302015-09-20T23:07:54+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

रामसृष्टी उद्यानाची झाली दुरवस्था
नाशिक : साधुग्राममध्ये साफसफाई आणि कचरा उचलण्याचे काम सुरू असताना तपोवनातील रामसृष्टीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने या उद्यानाला अवकळा आली आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र घाण निर्माण झाली आहे.
तपोवनातील एक आकर्षक उद्यान म्हणून खरे तर या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. सिंहस्थ काळात हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करणे गरजेचे होते. परंतु या ठिकाणी सिंहस्थ काळात अनेक भिकाऱ्यांचे वास्तव्य होते. काही पर्यटकही या ठिकाणी मुक्कामी राहिले. याच ठिकाणच्या जवळपास प्रातर्विधी केला जात असल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी आजही कायम आहे. उद्यानाच्या समोरील जागेत साठलेले मातीचे ढीग आणि झाडेझुडपे वाढल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि उष्टे अन्न टाकण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तर दुर्गंधीत अधिकच भर पडली आहे.
नदीच्या एका कोपऱ्याला उद्यान असल्याने या उद्यानाची पुरेशी देखभाल केली जात नसल्यामुळे या ठिकाणी नेहमीच गैरप्रकार चालतात. कुंभमेळ्यात गर्दीमुळे प्रेमीयुगुलांचा वावर कमी झाला असला तरी, सध्या भिकाऱ्यांनी या उद्यानाचा ताबा घेतलेला आहे.
या उद्यानात सर्वत्र घाण आणि कचरा साचला आहे. सध्या पावसामुळे याठिकाणी चिखल झाला असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी अगोदरच पडून असलेला कचरा कुजल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
उद्यानाच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, कित्येक दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नसल्याने आता दुर्गंधी सुटली आहे. या परिसराकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून होत आहे. (प्रतिनिधी)