जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम
By Admin | Updated: September 23, 2016 01:05 IST2016-09-23T01:03:21+5:302016-09-23T01:05:29+5:30
परतीचा पाऊस : दोन तासांत १०९ मिलीमीटर पाऊस नोंद

जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम
नाशिक : परतीच्या पावसाने आपली हजेरी कायम ठेवली असून, शहरात दिवसभर ढगाळ हवामान व अधूनमधून पावसाच्या सरींमुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झाला. दरम्यान, येवला तालुक्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने दैना उडविल्याचे वृत्त असून, नगरसूल येथे दोन तासांत १०९ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.
शहरासह जिल्ह्णात परतीच्या पावसाने जाता जाता चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत तर झालीच, परंतु धरणांच्या पाण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ९४ टक्के इतका पाऊस नोंदविला गेला असून, धरणांमध्ये ८५ टक्के साठा आहे.
गंगापूर धरण ९२ टक्के भरले आहे. गुरुवारीही पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. शहरात दुपारी १२ वाजेनंतर जवळपास तासभर कोसळल्यावर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजता पुन्हा झोडपून काढले. सायंकाळची वेळ असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदारांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पावसाची हजेरी कायम होती.