साधूंना थेट शिधापत्रिका!
By Admin | Updated: August 1, 2015 23:59 IST2015-08-01T23:54:44+5:302015-08-01T23:59:03+5:30
वाटपास प्रारंभ : पुरवठा निरीक्षकांच्या नेमणुका

साधूंना थेट शिधापत्रिका!
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये आलेले खालसे, आखाड्यांतील साधू-महंतांना स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका वाटपास प्रारंभ झाला असून, त्यासाठी पाच निरीक्षकांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून थेट आखाडे, खालशांमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. साधू-महंतांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी दमछाक होऊ नये म्हणून जिल्हा पुरवठा कार्यालयाने पाच निरीक्षकांची सेक्टरनिहाय नियुक्ती केली आहे. या निरीक्षकांनी आपल्यासोबतच शिधापत्रिकेचे अर्ज नेऊन प्रत्येक खालसा व आखाड्याला भेटी देण्यास सुरुवात केली असून, तेथील साधू-महंतांकडून शिधापत्रिकेसाठीची कायदेशीर व कागदोपत्री पूर्तता करून घेतली जात आहे. खालसे, आखाड्यांना जागावाटपाचे पत्र, त्यांच्या खालशांचे नोंदणी क्रमांक, राहणाऱ्या साधूंच्या नावांची यादी तयार करून तात्पुरत्या शिधापत्रिका वाटप केल्या जात असून, या शिधापत्रिकेची वैधता ३० सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. शिधापत्रिकाधारक साधूंसाठी तपोवनातच पाच रेशन दुकाने सुरू करण्यात आले आहेत. शिधापत्रिकेवर नावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रतिमहा पाच किलो धान्य स्वस्त दरात रेशन दुकानाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीच अतिरिक्त धान्य साठा मंजूर करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)