मराठा संघटना एकत्र येत असल्याने प्रश्न सुटतील
By Admin | Updated: September 3, 2016 23:18 IST2016-09-03T23:18:12+5:302016-09-03T23:18:43+5:30
महाडिक : मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मराठा संघटना एकत्र येत असल्याने प्रश्न सुटतील
सिन्नर : पुणे येथे राज्यातील ३२ मराठा संघटनांची एकत्र बैठक झाली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. राज्यातील मराठा संघटना एकत्र येत असल्याने मराठा समाजाविषयी विविध प्रश्न सुटतील, असा आशावाद मराठा आरक्षण समन्वय समितीचे संस्थापक विजयसिंह महाडिक यांनी व्यक्त केला.
सिन्नर येथे मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी महाडिक बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात दोन वर्षात मराठा संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नव्हती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यात प्रमुख भूमिका बजावून मुख्यमंत्र्यांसोबत या संघटनांची बैठक घडवून आणल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, मुंबई येथे छत्रपती शिवरायांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करावे, मराठाभूषण आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी समिती करून त्यासाठी पाचशे कोटींची तरतूद करावी आदिंसह विविध मागण्यांची फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी मराठा पंचायतीचे अनिल साळुंखे, अॅड. तात्यासाहेब घुमरे, राजेंद्र गडकर, शंकर वारुंगसे, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष रमेश आमले, अनिल वारुंगसे, विजय पगार, रवींद्र पाटील, भगवान पथवे, रवींद्र सदगीर, सुदाम वारुंगसे, धनंजय शिंदे, मंगेश क्षीरसागर, भूषण दुबे, अमर सांगळे, धनंजय वारुंगसे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)