डाळींबबागा उद्ध्वस्त
By Admin | Updated: July 11, 2014 00:50 IST2014-07-10T23:17:22+5:302014-07-11T00:50:42+5:30
डाळींबबागा उद्ध्वस्त

डाळींबबागा उद्ध्वस्त
विंचुरे : आधीच पावसाने पाठ फिरवलेली असताना डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव झाल्याने बागलाण परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे इतर पिके बाजूला सारून शेतकरी डाळिंबाची लागवड करत आला आहे. मात्र बहार धरल्यानंतर विहिरींनी तळ गाठल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी टँकरद्वारे डाळींब बागा वाचविण्याचा प्रयत्न केला. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींना पाणी आहे. त्यांच्याकडून पाणी विकत घेऊन मार्च महिन्यापासून बागांना पाणी देत आहेत. जून महिन्यात पाऊस येईल या अपेक्षेने बागा वाचवल्या मात्र जुलै मध्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने डाळिंबाना पाण्यासाठी वाढीव पैसे देऊन अजूनही पाणी विकत घ्यावे लागत आहे.
मार्च महिन्यात टँकरद्वारे पाणी देण्यासाठी प्रतिटँकर ६०० रुपये मोजावे लागायचे तसेच दिवसांतून तीन ते चार टँकर पाणी टाकावे लागायचे मात्र आजपर्यंत पाऊस न झाल्यामुळे टँकरच्या पाण्याचे ‘भाव’ वाढून ते एक हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. सध्या दिवसागणिक पाच ते सहा टँकर पाणी द्यावे लागत आहे.
एवढा खर्च करून वाचवलेल्या बागांवर आता तेल्या रोगाने थैमान घातले आहे. विंचुरे, वटार, डोंगरेज, वनोली आदि गावांमध्ये तेल्याने डाळींबबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. मार्चमध्ये झालेल्या गारपिटीत येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही तोच तेल्या रोगाच्या आक्रमणामुळे महागड्या औषधांचा तसेच टँकरद्वारे पाणी टाकण्याचा खर्चसुद्धा निघेल का, असा सवाल बळीराजाला सतावतो आहे.
मार्च महिन्यात झालेली गारपीट, हातचा गेलेला कांदा, केविलवाणा प्रयत्न करून वाचविलेल्या डाळींबबागा, त्यावरील तेल्या रोगाचा झालेला प्रादुर्भाव गारपीटग्रस्तांना शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत, कांद्याचे वाढलेले निर्यातमूल्य, त्यामुळे कवडीमोल भावात, विकला जाणारा कांदा आणि या सर्वांना दुष्काळात तेरावा महिना असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)
गुरुपौर्णिमा महोत्सव
नाशिक : येथील विश्व जागृती मिशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि.१२) गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूररोड येथे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ओंकारजप, सामुदायिक प्रार्थना, गुरुचरणपादुका पूजन, भजन, आरती आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या महोत्सवात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन ओंकारसिंह राजपूत, करमचंदानी, शाम ढेडिया, भगवानभाई अग्रवाल, अभिमन्यू सूर्यवंशी, वंजारी, रमेश कासार आदिंनी केले आहे.