वृक्षलागवडीबाबत जनजागृती
By Admin | Updated: June 30, 2016 00:54 IST2016-06-29T22:49:50+5:302016-06-30T00:54:46+5:30
कळवण : दोन लाख ७७ हजार रोपांची होणार लागवड

वृक्षलागवडीबाबत जनजागृती
कळवण : पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी वनसंवर्धन अभियानाअंतर्गत दि. १ ते ७ जुलैदरम्यान राज्यात दोन कोटी रोपांच्या लागवडीचा शासनाचा उद्देश आहे. तालुक्यात नगरपंचायतीसह तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांची जय्यत तयारी सुरू असून, कळवण वनपरिक्षेत्रात जनजागृती करून जास्तीत जास्त रोप लागवड करण्यासाठी वनविभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे.
तालुक्यात कळवण वनपरिक्षेत्र विभागात एक लाख ५४ हजार ८००, तर कनाशी वनपरिक्षेत्र विभागात एक लाख २१ हजार ५०० वृक्षलागवडीचा संकल्प असून, संपूर्ण तालुक्यात दोन लाख ७७ हजार ३०० रोपांची लागवड करण्याचा निर्धार कळवण वन विभागाने केला आहे. तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीअंतर्गत शाळा, आरोग्य केंद्रे व माध्यमिक शाळा, संस्था, ग्रामपंचायत आदिंनी या अभियानात भाग घेतला असून, वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे.
कळवण वनपरिक्षेत्रातील एकूण १३ गावांमध्ये ३२५ हेक्टर क्षेत्रावर एकूण एक लाख ५४ हजार ८००, तर कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख २१ हजार ५०० विविध जातींच्या रोपांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. याबाबत गावागावांत जाऊन जनजागृती करण्याचे काम जोरात सुरू आहे. गावपातळीवरील ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे, माध्यमिक विद्यालय, तलाठी, सोसायटी, सहकारी संस्था प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यातील १३ गावांतील १३ रोपवन स्थळांची यासाठी निवड करण्यात आली असून, तेथे खड्डे खोदण्याचे कामे पूर्ण झाले आहे. दि. १ जुलै रोजी कळवण प्रादेशिक वनक्षेत्रात वंजारी व साकोरा प्रत्येकी १३,५००, गोबापूर- ४१००, कुंडाणे-ओतूर- १३५००, दह्याणे-ओतूर- १३५००, भुसणी- १३५००, विसापूर- १३५००, बिजोरे- १३५००, निवाणे- १३५००, साकोरा-जिरवाडे- १३५००, इंशी- ७७०० असे रोपे लागवडीचे नियोजन असून, सकाळी ६ वाजता वृक्षलागवडीस प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)
या कार्यक्र मांतर्गत कळवण तालुक्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी व अशासकीय संस्था, उद्योजक, सहकारी संस्था, शाळा-महाविद्यालये, लोकप्रतिनिधी इत्यादिंचा सहभाग मिळवण्यासाठी कळवण व कनाशी प्रादेशिक वनविभागातर्फे गावागावांमध्ये जाऊन सर्वांना सहभागी होण्याबाबत आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच बॅनर लावणे, निमंत्रणपत्रिका देणे, गावागावांत ग्रामस्थांच्या बैठका घेणे, वाहनास स्पिकरद्वारे ध्वनिफीत वाजवून जनजागृती करण्याचे काम जोरात सुरू आहे. नागरिकांनी या कार्यक्र मात सहभागी व्हावे, असे आवाहन कळवणचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे, वन परिमंडल अधिकारी वसंत पाटील, पंकज देवरे यांनी केले आहे.