संरक्षक जाळ्यांचा फास सुटला झाडे सुरक्षित : पालिक प्रशासनाला आली जाग
By Admin | Updated: April 17, 2017 00:38 IST2017-04-17T00:38:21+5:302017-04-17T00:38:34+5:30
पालिका प्रशासनाला आली जाग

संरक्षक जाळ्यांचा फास सुटला झाडे सुरक्षित : पालिक प्रशासनाला आली जाग
नाशिक : गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकापासून तर थेट शहीद सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये वाढलेल्या झाडांच्या बुंध्यांभोवती संरक्षक जाळ्यांचा फास आवळला गेला होता. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाडांभोवतालच्या जाळ्या काढून घेण्यास सुरुवात झाली.
गंगापूररोडवरील झाडांची वाढ झाल्याने या त्यांच्याभोवती असलेल्या संरक्षक जाळ्या बुंध्यामध्ये रूतत चालल्या होत्या. यामुळे झाडे असुरक्षित बनली होती तसेच संरक्षक जाळ्याही तुटून दुभाजकाबाहेर रस्त्यांमध्ये येत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला होता. रोपट्यांची दमदार वाढ होऊन वृक्षांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी वृक्ष संरक्षक जाळ्या लावल्या जातात; मात्र जेव्हा रोपट्यांचे झाड होते तेव्हा या जाळ्यांचे संरक्षण काढून घेणे गरजेचे असताना पालिके च्या उद्यान विभागाच्या उदासीनतेमुळे गंगापूररोडवरील झाडांचे बुंधे जखमी होत होते. दुभाजकांमध्ये बूच, बकाम यांसारख्या प्रजातीची झाडे चांगली वाढली आहेत. या झाडांमुळे या रस्त्याला हिरवाईचे कोंदण प्राप्त झाले असून, या सौंदर्याला पालिकेच्या उद्यान विभागाच्या निष्काळजीपणामुळे बाधा पोहचत होती. उद्यान विभागाने संरक्षक जाळ्या काढून घेण्याची मागणी निसर्गप्रेमी रहिवाशांकडून केली जात होती.