प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला
By Admin | Updated: September 20, 2014 00:33 IST2014-09-16T01:11:40+5:302014-09-20T00:33:06+5:30
प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला

प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला
नाशिक : पंचवटीत साधुग्रामसाठी सत्वर जागा ताब्यात मिळाव्यात यासाठी महापालिकेने एकास दहा म्हणजे दहापट टीडीआर देण्याचा पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने फेटाळला आहे. आणि येत्या ९० दिवसांत फेरप्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
कुंभमेळ्यासाठी ३२३ एकर क्षेत्र साधुग्राम म्हणून आरक्षित करण्यात येणार आहे. त्यापैकी पालिकेच्या मालकीचे ५४ हे. क्षेत्र असून, उर्वरित क्षेत्राचे तीन भाग पाडून त्यानुसार आरक्षणासाठी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. ३२३ एकर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणात मोबदला देण्याइतपत महापालिकेची क्षमताच नाही. महापालिकेने तसे राज्य शासनाला कळविले होते. गेल्यावर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत साधुग्रामकरिता जागा ताब्यात घेण्यासाठी जमीनमालकांना नियमित टीडीआरपेक्षा अधिक बोनस टीडीआर देण्याचा विचार मांडला होता. त्यानुसार महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. महापालिकेच्या महासभेत त्यानुसार एकास दहा म्हणजे दहापट टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्यानंतर आता २८ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने हा प्रस्ताव फेटाळला आहे. महापालिकेने फेरप्रस्ताव सादर करताना त्याच्या पुष्ट्यर्थ सबळ कारणे देण्यासही सांगितले आहे. येत्या ९० दिवसांत हा निर्णय महापालिकेने घ्यावा, त्यानंतर हरकती आणि सूचनांची कार्यवाही करून अंतिमत: प्रसिद्धी द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)