शासनाला प्रस्ताव : लाखभर लोकसंख्येला टॅँकरने पाणीपुरवठा

By Admin | Updated: August 24, 2015 23:34 IST2015-08-24T23:34:20+5:302015-08-24T23:34:51+5:30

मनमाडला पाण्याचा ठणठणाट!

Proposal to the Government: Water supply to the population of the lakhs | शासनाला प्रस्ताव : लाखभर लोकसंख्येला टॅँकरने पाणीपुरवठा

शासनाला प्रस्ताव : लाखभर लोकसंख्येला टॅँकरने पाणीपुरवठा

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने मनमाड शहरात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. पुढील पाण्याचे आवर्तन मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंखेच्या शहराला सध्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात आवर्तनाची वाट पहात महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीपुरवठा संपुष्टात आल्याने हे धरण कोरडेठाक पडले आहे. शहरातील आययूडीपी भागातील पाणीपुरवठा झाल्यानंतर मुरलीधरनगर येथील टाकीला पाणीपुरवठा सुरू असताना धरणातील पाणी संपल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. बुधलवाडी भागाला या टाकीतून पाणीपुरवठा होत असतो; मात्र पाणीच संपल्याने या भागातील महिलांची पाण्याची प्रतीक्षा फोल ठरली. या भागातील रहिवाशांना १२ दिवसांपूर्वी पाणी मिळाले होते. आता पाण्याचा थेंब कधी मिळणार याबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात येत आहे.
दोन वर्षापासून वागदर्डी धरण भरलेच नाही. उपलब्धतेअभावी सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १२ दिवसांआड करण्यात येत होता. सध्या पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. त्यामुळे महिलावर्गाचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहे. काही भागात पाण्याच्या टाकीखाली असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत होती; परंतु धरणातील पाणीसाठा संपल्याने पाण्याच्या टाक्यासुध्दा कोरड्याठाक पडल्या आहेत.
पालिकेच्या म्हणण्यानुसार ३० आॅगस्टला पाण्याचे आवर्तण मिळणार आहे. सदरचे पाणी वागदर्डी धरणापर्यंत पोहोचण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे तब्बल दहा-बारा दिवस मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Proposal to the Government: Water supply to the population of the lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.