पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

By Admin | Updated: June 24, 2014 00:25 IST2014-06-23T00:15:21+5:302014-06-24T00:25:29+5:30

सिन्नर : रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.

Prolonged irrigation of Kharipa by giving rain to the yield | पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर

सिन्नर : जून महिन्यातील तिसरा आठवडा उलटला आहे. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र संपले तरीही तालुक्यात पावसाचा टिपूस पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील ६४ हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.
सलग चौथ्या वर्षीही पावसाने दगा दिल्याने यंदाही खरीप हंगाम होतो की नाही या चिंतेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारपासून आर्द्रा नक्षत्र मोर वाहनावर येत आहे. या नक्षत्रात पाऊस झाला तरच खरिपाच्या पेरण्या शक्य आहे. तथापि, उशीर झाल्यास पेरण्या वाया जातील, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात गत तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. तीन वर्षांत सुमारे खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगामांतून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागातील बागायती क्षेत्रात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन हाती आले नसल्याने त्यातच अवकाळीचा दणका बसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असतानाच यंदा चांगला पाऊस होऊन खरीप हंगामात बरकत मिळेल, या भोळ्या आशेवर शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागले होते. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतींची कामे जवळपास पूर्ण झाली असूून, शेतकरी पावसाची आकाशाकडे डोळे लावून वाट पहात आहेत.
मात्र जून महिना कोरडा जाऊ लागल्याने खरिपाच्या आशा धूसर होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊसच पडत नसल्याने सिन्नर शहरासह तालुक्यातील बी- बियाणे, खते व औषधांची विक्री करणारे कृषी सेवा केंद्रांमधून अद्याप खरेदीला सुरुवात झाली नसल्याने ही दुकाने ग्राहकांअभावी ओस पडल्याची स्थिती आहे. यंदा बी-बियाणे व खतांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. मात्र शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने खते व बियाण्यांसाठी मोठा खर्च करण्यापेक्षा शेतीच करावी की नाही अशा मनस्थितीपर्यंत शेतकरी पोहोचले आहेत. खते व बियाण्यांच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Prolonged irrigation of Kharipa by giving rain to the yield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.