समिट स्टेशनला समस्यांचा विळखा
By Admin | Updated: July 11, 2014 00:47 IST2014-07-10T23:24:37+5:302014-07-11T00:47:51+5:30
समिट स्टेशनला समस्यांचा विळखा

समिट स्टेशनला समस्यांचा विळखा
रेडगाव खुर्द : चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातून साधारण २५ ते ३० किलोमीटरच्या हद्दीतून मध्य रेल्वेचा मार्ग गेलेला आहे. समुद्र सपाटीपासून सर्वांत उंचीवरील समिट हे तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असताना सध्या ते रस्ता, पाणी, निवारा शेडअभावी समस्यांच्या खोल गर्तेत सापडलेले आहे.
साधारण शंभर वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या रूपाने चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुक, वाकीखुर्द, काळखोडे, तळेगावरोही, साळसाणे, निंबाळे, रायपूर, वडगावपंगू, भडाणे आदि गावांच्या हद्दीतून लोहमार्ग गेलेला आहे. समुद्र सपाटीपासून सर्वांत उंच अर्थात ६४१.१६ मीटर उंचीच्या तळेगावरोही, निंबाळे, रायपूर या तीन गावांच्या सरहद्दीवरील या स्थळावर पूर्वी कोळसा व डिझेलवर चालणारी प्रत्येक प्रवासी व मालवाहू गाडी हमखास थांबायची. त्या अनुषंगाने या ठिकाणी समिट स्टेशनची निर्मिती करण्यात आली.
सध्या येथे मुंबईकडे व भुसावळकडे जाणाऱ्या तीन रेल्वेंना थांबा आहे. दररोज शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात. अनेक गाड्या येथे थांबतात. स्वातंत्र्यापूर्वी व नंतरच्या ६५ वर्षांत सदर स्टेशनवर कायमस्वरूपी पाण्याची सोय होऊ शकली नाही. जानेवारी, फेब्रुवारी उजाडला की टंचाई सुरू होते. येथे अद्याप स्वच्छतागृह नसल्याने व रेल्वेच्या दोन्ही बाजूला नागरीवस्त्या असल्याने कुचंबणा होते. येथे सहा प्रवासी बसू शकतील इतकेच निवारा शेड असून, बंदिस्त शेड नसल्याने हिवाळ्यात कुडकुडत व पावसाळ्यात भिजल्या शिवाय पर्याय नसतो. तसेच चांदवड व येवला तालुक्यांतील गावातील नागरिकांना लासलगाव-मनमाड स्टेशन २० कि.मी. अंतरावर आहे. नाशिक, मुंबईसह पूर्वेकडे जाण्यासाठी सदरचे स्थानक योग्य आहे.
परंतु सोयीअभावी नागरिकांची गैरसोय होते. तसेच अनेकांना
दररोज कामानिमित्त नाशिक, मुंबईला जावे लागते. त्या पाशर््वभूमीवर नाशिककडे जाताना सकाळी पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसला थांबा दिल्यास नागरिकांसह नोकरदार, विद्यार्थी यांची सोय होऊन प्रवासी वाढणार आहे. तशी मागणी केली जाते.
पादचारी मार्गाचा अभाव-ङ्क्त
सदर रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला नागरीवस्त्या असून, दक्षिणेला
जिल्हा परिषद शाळा आहे. पादचारी पुलाअभावी शाळेत येताना चिमुकल्यांना जीव धोक्यात घालून यावे लागते. त्याचप्रमाणे प्रवाशांना व नागरिकांना कामानिमित्त ये-जा करताना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. त्यामुळे येथे पादचारी पुलाची आवश्यकता आहे.
रस्त्याचा गहन प्रश्न- स्टेशन पासून साधारण एक कि. मी.अंतरावर तळेगाव, रायपूर, निंबाळे,येथून येणारे रस्ते संपतात. तेही कच्च्या स्वरूपाचे आहे. स्टेशनपर्यंत पोहचण्यास एकही बाजूने अद्याप रस्ता होऊ शकलेला नाही. त्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. धोकादायक परिस्थितीत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. समस्यांना वारंवार तोंड द्यावे
लागते. (वार्ताहर)