देवळ्याचा पूर्वभाग दुष्काळाच्या छायेत
By Admin | Updated: July 5, 2014 00:26 IST2014-07-04T22:10:07+5:302014-07-05T00:26:26+5:30
देवळ्याचा पूर्वभाग दुष्काळाच्या छायेत

देवळ्याचा पूर्वभाग दुष्काळाच्या छायेत
मेशी : जून महिना संपला तरीदेखील देवळा तालुक्यात मान्सूनचा पाऊस नाही. मृग नक्षत्रापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने बळीराजा कमालीचा धास्तावलेला आहे.
देवळा तालुक्याचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. गारपिटीमुळे या भागातील कांद्याचे बियाणे (उळे) पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. बहुसंख्य शेतकऱ्यांनी जळगाव, जालना जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील दक्षिण भागातून मिळेल त्या किमतीला बियाणे खरेदी केले आहे. १० ते १२ हजार रुपये पायलीप्रमाणे बियाणे खरेदी केले; परंतु पाऊस नसल्याने ते बियाणे शेतात टाकण्याऐवजी अजूनपर्यंत घरातच पडली आहेत. पाऊस लांबत असल्याने कांदा पीक घेण्याचे नियोजन समीकरण युक्त असताना बियाणे खराब होऊ लागली आहेत. पाऊस किती दिवस लांबतो याचीच चिंता सगळ्यांना भेडसावत आहे.
दहा-बारा वर्षांपूर्वी पाऊस पडत नसल्यास ग्रामीण भागातील असंख्य तरुण शेतकरी रात्रीच्या वेळेस ‘धोंडी-धोंडी पाणी दे’ असे गाणी म्हणत. वरुणराजाला आळवणी घालत असत. मात्र, ही प्रथा आता कालबाह्य झाली आहे. पूर्वी डोक्यावर लिंबाचे पानांचा टोप, कमरेला घुंगरू, पायात घुंगरू असा पेहराव करून दहा ते बारा उत्साही तरुण विशिष्ट वाद्याच्या चालीवर गाणे म्हणत पाणी मागत असत. महिलावर्ग त्या धोंड्याला डोक्यावर पाणी टाकून ओल करीत असत; परंतु ती प्रथाही आता उरलेली नाही याची खंत जुन्या वयस्करांना आहे. कारण आता ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी शेतवस्तीवर राहू लागल्याने एकत्र जमाव जमणे दुरापास्त झाले आहे. पूर्वी ग्रामस्थ गावातच राहत असत.एवढे मात्र नक्की निसर्गाबरोबर जुन्या पारंपरिक पद्धतींनी आता डोके वर काढणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. पाऊसच नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. (वार्ताहर)