लोंबकळलेल्या तारांमुळे धोका
By Admin | Updated: September 11, 2016 01:01 IST2016-09-11T00:53:10+5:302016-09-11T01:01:23+5:30
शेतकऱ्यांमध्ये संताप : वीज वितरणचे दुर्लक्ष

लोंबकळलेल्या तारांमुळे धोका
स्थळ :पिळकोस
वेळ : दुपारी १२ वाजता
पिळकोस येथील पिवळ शिवारातील ग्रुप नं. २ मधील विद्युतवाहक तारा शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या असून, त्या मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. प्रत्येक खांबातील अंतर अधिक असल्यामुळे या वीजवाहक तारा हाताला लागतील अशा स्थितीत असल्याने शेतकऱ्यांना शेतात कामे करता येत नाही. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीचे कामे करावी लागत आहे. हा तारा वीस ते तीस शेतकऱ्यांच्या शेतातून गेल्या असून, त्या लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज वितरण कंपनीकडून हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. पिळकोस येथील शेतकरी संजय गुजबळ जाधव या शेतकऱ्याला शेतात मका पिकाला पाणी देत असताना विजेचा धक्का लागल्याने गावातील व शिवारातील शेतकरी बांधवांकडून वीज वितरण कंपनीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार फोनद्वारे, तोंडी, समक्ष भेटून परिस्थिती सांगितली नंतर लेखी अर्ज दिला; मात्र महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्यामुळे अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी
रामदास बच्छाव, साहेबराव रेवबा जाधव, अभिजित वाघ, पंकज बच्छाव, प्रकाश जाधव, सचिन जाधव, संजय जाधव, रामराव वाघ, प्रवीण मोरे, जगन्नाथ गांगुर्डे यांसह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ ऊर्जामंत्री यांच्याकडे दाद मागणार आहेत. (वार्ताहर)