डाळिंबाला कवडीमोल भाव; बळीराजा हवालदिल
By Admin | Updated: September 4, 2014 00:06 IST2014-09-03T22:19:01+5:302014-09-04T00:06:49+5:30
डाळिंबाला कवडीमोल भाव; बळीराजा हवालदिल

डाळिंबाला कवडीमोल भाव; बळीराजा हवालदिल
विंचुरे : डाळिंबाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे बळिराजा संकटात सापडला आहे. मागील वर्षी ७०ते ८० रुपये किलो दर असलेल्या डाळिंबाला यंदा केवळ २० रुपये किलो इतका दर मिळत आहे.
डाळींब हे कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून कसमादे भागातील अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाची लागवड केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन केलेल्या डाळिंबावर यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाने अवकृपा केली. जानेवारीत बहार धरलेल्या डाळींब पिकावर फूल निघण्याच्या काळात आणि फळधारणेच्या वेळी म्हणजेच फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक बागा उद्ध्वस्त झाल्या. काही शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून बागा वाचवण्यात यश मिळवले. मात्र मे व जून महिन्यात तेल्या रोगाने पुन्हा डाळिंबावर झडप घातली. त्यामुळे शेकडा ७० टक्के बागा उद्ध्वस्त झाल्या. तेल्या रोगाने परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे हातात आलेले डाळिंबाचे फळे तोडून फेकून देण्यात आली आणि अशातच वाचलेल्या डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मात्र पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
व्यापारीवर्गाने शेतात येऊन डाळींब खरेदी केल्यास ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते कारण त्यामुळे त्यांचा वाहतूक, आडत, हमाली हा खर्च वाचतो. मात्र व्यापारी डाळींब खरेदीला येत नसल्यामुळे पक्का झालेला डाळींब मार्केटमध्ये नेऊन विकण्याशिवाय बळिराजाला पर्याय नाही. आज डाळिंबाला सरासरी २० रुपये किलो असा दर मिळत आहे. अशा दरामुळे शेतकऱ्यांचा डाळिंबाला झालेला खर्चसुद्धा निघेणासा झाला आहे. डाळींब पिकाला बहार धरल्याच्या दिवसापासून तर डाळींब निघेपर्यंत एकरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च होतो आणि उत्पन्न एकरी पाच ते सहा टन येते. यावरून डाळिंबाचा होणारा खर्चसुद्धा निघत नसल्याचे चित्र स्पष्ट होते.
परदेशात जर डाळींब विक्री चालू झाली तर भाव थोड्याफार प्रमाणात वाढतील, असे व्यापारीवर्गात बोलले जात आहे. म्हणून सध्यातरी निर्यात चालू होण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. (वार्ताहर)