डाळींब @ 1.25 रूपये किलो
By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:00:31+5:302014-08-09T00:48:24+5:30
डाळींब @ 1.25 रूपये किलो

डाळींब @ 1.25 रूपये किलो
सटाणा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगला देश, नेपाळच्या सीमा बंद केल्यामुळे डाळींब निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. निर्यातबंदीचा परिणाम म्हणून काल शुक्रवारी सटाणा बाजार समिती आवारात डाळिंबाची प्रचंड आवक झाल्यामुळे भावात कमालीची घसरण होऊन प्रति क्रेटला किमान पंचवीस रुपये भाव मिळाला, तर कमाल अकराशे रुपये भाव मिळाला. दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी डाळींब खरेदी न केल्यामुळे माल माघारी न्यावा लागल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
आधीच डाळींब उत्पादक शेतकरी गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाला असताना त्यातून सावरत बागा कशातरी उभ्या केल्या. पीक जोमात असतानाच तेल्याने घाला घातला. तेल्याशी सामना करत बागा जगविल्या, मात्र सर्वाधिक डाळिंबाची मागणी असलेल्या बांगला देशाची सीमा बंद केल्यामुळे निर्यातीचा मार्ग रोखला गेला आहे. सीमा बंद झाल्यामुळे तसेच देशांतर्गत बाजार पेठांमध्ये ही पावसामुळे डाळिंबाला उठाव नसल्यामुळे स्थानिक बाजार पेठांमध्ये प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी सटाणा बाजार समिती आवारात डाळिंबाची सहा हजार क्रेट आवक होती. काल डाळींब सर्वाधिक अकराशे भावाने, तर सरासरी आठशे रुपये भावाने विकले गेले.
असले तरी सर्वाधिक डाळिंबाचे क्रेट पंचवीस ते साठ रुपयालाच विकले गेले. कालची आवक पाहून काही व्यापाऱ्यांनी माल घेण्याची आपली क्षमता नसल्याचे कारण दाखवत हात वर केले. त्यामुळे आवकेच्या वीस टक्के शेतकऱ्यांना आपला माल माघारी न्यावा लागला. काही शेतकऱ्यांनी तर अक्षरश: डाळींब फेकून संताप व्यक्त केला. (वार्ताहर)