दुसऱ्या शाहीस्नानालाही गोदावरीचे पाणी प्रदूषित
By Admin | Updated: April 11, 2016 00:08 IST2016-04-10T23:19:08+5:302016-04-11T00:08:31+5:30
मंत्राज्चा निष्कर्ष : तपोवनात आढळले साडेचार कोटी जीवाणू , ध्वनिप्रदूषणाचाही उच्चांक

दुसऱ्या शाहीस्नानालाही गोदावरीचे पाणी प्रदूषित
नाशिक : दुसऱ्या शाहीस्नानाच्या पर्वणीला हजारो भाविकांनी गोदापात्रात डुबकी लगावली होती. पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी गोदापात्राच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी ‘मंत्राज’ संस्थेने घेतले होते. दरम्यान, तपोवन येथे नदीपात्रात सर्वाधिक साडेचार कोटी जंतू आढळून आल्याचा निष्कर्ष तपासणी अहवालामध्ये काढण्यात आला आहे.
पहिल्या शाहीस्नानाच्या तुलनेत दुसऱ्या शाहीस्नानाला भाविकांची मोठी गर्दी गोदाकाठावर उसळली होती. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने गंगापूर धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी खळाळली होती. त्यामुळे भाविकांचाही आनंद द्विगुणित झाला होता. दुसऱ्या शाहीस्नानानंतर मंत्राजच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने जलप्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी गोदाकाठावर चार ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले होते. दरम्यान, तपोवनात सर्वाधिक साडेचार कोटी इतके कॉलीफॉर्म नावाच्या जीवाणूंचा समूह, तर रामकुंडात २४ लाख आणि अहल्यादेवळी होळकर पुलालगत दोन लाख इतके जीवाणू आढळून आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकानेही जलप्रदूषणाची पडताळणी करण्यासाठी गोदापात्रातील पाण्याचे नमुने तपासले होते. पर्वणीच्या काळात घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल मंडळाकडून सादर केला जात नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत मंडळाचे कान टोचले होते. त्यानंतर मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी अहवाल सादर करण्यात आला होता.
सदर अहवालानुसार कुंभमेळ्याच्या कालावधीत कुठल्याही शाहीस्नानाला नदीपात्र प्रदूषित झाले नाही. पाण्यामध्ये जैव रासायनिक व रासायनिक प्राणवायूची पातळीदेखील मर्यादेपेक्षा अधिक वाढली नसल्याचा दावा करण्यात आला होता. एकूणच गोदावरी प्रदूषणमुक्त राहिल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काढला होता; मात्र त्यांच्या अहवालाची मंत्राज या खासगी कंपनीने केलेल्या तपासणी अहवालासोबत तुलना केली, तर संपूर्ण विरोधाभास असल्याचे दिसून येते. यामुळे मंडळाचा अहवाल हा शासकीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आला होता की काय, असा प्रश्न उपस्थित होते आहे. ध्वनी प्रदूषणानेही उच्चांक गाठल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)