‘त्याच त्या’ उमेदवारांभोवती फिरतेय राजकारण
By Admin | Updated: September 21, 2014 00:39 IST2014-09-20T20:49:46+5:302014-09-21T00:39:20+5:30
‘त्याच त्या’ उमेदवारांभोवती फिरतेय राजकारण

‘त्याच त्या’ उमेदवारांभोवती फिरतेय राजकारण
आदिवासीबहुल तालुका असलेल्या बागलाणमध्ये भाजपाचा चांगलाच वरचष्मा आहे. अर्थात, अन्य बहुजन समाज हा निर्णायक घटक असतोच. त्याच जोरावर राजकारणाची समीकरणे ठरत असतात. १९९४ पर्यंत कॉँग्रेसचा प्रभाव या मतदारसंघावर होता खरा; परंतु नंतर सातत्याने या पक्षाला बऱ्यापैकी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याउलट भाजपाचे प्रस्थ अधिक वाढत गेले. पाच वर्षांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात समाविष्ट असलेल्या बागलाण तालुक्यातून भाजपाचे उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांना मोठे मताधिक्य होते. त्याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपा उमेदवाराला बागलाणमधून तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती. भाजपाचा वरचष्मा असल्याने गेल्या रविवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपानेच बाजी मारली. विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या भाजपात आज तरी विद्यमान आमदार उमाजी बोरसे आणि माजी आमदार दिलीप बोरसे यांच्या नावांची चर्चा आहे. दोघेही बंधू असले, तरी दिलीप बोरसे अन्य पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जाते. स्थानिक भाजपाकडे हे दोनच उमेदवार असले, तरी एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरा बंडखोरी करेल अशी शक्यता तूर्तास तरी नाही. तथापि, उभय बंधूंना स्थानिक भाजपाच्या गटबाजीचा काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचा प्रभाव असलेल्या या तालुक्यात शिवसेनेचे सटाणा शहर वगळता ग्रामीण भागात प्रस्थ नाही. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी असली, तरी त्यांच्याकडे गेल्यावेळचे पराभूत अपक्ष उमेदवार संजय चव्हाण यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपा म्हटले तरी तीच नावे पुढे येतात आणि विरोधक म्हटले तरी तीच ती नावे पुढे येतात. कॉँग्रेस आघाडी इतकी पक्की आहे, की गेल्यावेळी झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेसने राष्ट्रवादीला बाय दिला आहे. संजय चव्हाण हे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरू शकतील असे सांगितले जात असले, तरी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्यासमोरील न्यायालयीन लढाई ही उमेदवारी कितपत सुसह्य करते हे महत्त्वाचे आहे. अन्यथा पर्यायी उमेदवाराचा शोध घ्यावा लागण्याची शक्यता आहे. साहजिकच आता तरी भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. मनसेकडून दावेदार मानले गेलेल्या भिवराज घोडे यांनी पक्ष सोडल्याने मनसेकडे दावेदार नाही. आदिवासीबहुल भाग असला, तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपाइं यांचे उमेदवार नावालाच आहेत.
एरवी शहरी भागातच वर्चस्व असल्याचे मानल्या जाणाऱ्या भाजपाचे एखाद्या तालुक्यात वर्चस्व असणे हीच काहीशी सुखावह गोष्ट. तथापि, उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार तेच ते आणि विरोधकातील उमेदवारही तेच ते अशी अवस्था बागलाण तालुक्यात झाली आहे. त्यातही भाजपा-सेना बेबनाव नाही आणि आघाडीत बिघाडी नसल्याने या तालुक्यात उमेदवारीची भाकरी तरी फिरणार की नाही, अशी अवस्था आहे.