मालेगाव- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडीसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून, शहरातील कट्टर विरोधक एकत्र येऊन पॅनल तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्याची चर्चा रंगली आहे.येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक सुमारे आठ वर्षांनी न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात येत आहे. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने जिल्हा निबंधकांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार अर्ज दाखल करण्यात आले असून, या अर्जांची छाननी झाली आहे. हा निवडणूक कार्यक्रम सुरू असला तरी, बाहेर मात्र याचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या निवडणुकीत विद्यमान सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सत्ता काबीज केली होती. ती सत्ता कायम राखण्याची त्यांची इच्छा आहे. बाजार समितीतील सत्तेचा वापर तालुक्यातील राजकारणासाठी फायदेशीर आहे. गेल्या निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी व तालुक्यातील राजकारणाला शह देण्यासाठी या निवडणुकीत एक पॅनल तयार करण्यात आले असून, त्यांनी कर्मवीर हिरे सेना असे नामकरण करण्यात आले आहे.या पॅनलला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकवटण्यास सुरुवात झाली आहे. इतरवेळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे विरोधक राजकारणात कधी कायमस्वरूपी शत्रू नसतात तसेच विरोधकांचा विरोधी हा मित्र या भावनेने शहरात विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. या विरोधी नेत्यांच्या तीन ते चार बैठका झाल्या असून, त्यात एकत्रित निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले असल्याचे बोलले जाते. या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा केली जात असून, त्यात प्रत्येकाच्या वाट्याच्या संचालकांची आकडेवारी व काही मुद्दे यात अडथळा ठरत असल्याचे बोलले जाते. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (वार्ताहर)
राजकारण तापले : मालेगाव बाजार समिती निवडणूक
By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST