वस्त्रांतरगृह पाडण्यामागे दडले राजकारण
By Admin | Updated: January 10, 2015 00:30 IST2015-01-10T00:29:53+5:302015-01-10T00:30:08+5:30
महंतांचे ‘बळे-बळे’ फुंकले कान : पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचेही प्रकटले अज्ञान; अधिकारी मात्र गोंधळले

वस्त्रांतरगृह पाडण्यामागे दडले राजकारण
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडालगत चोवीस वर्षांपूर्वी महिला भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्याचा मुद्दा गुरुवारी झालेल्या सिंहस्थविषयक बैठकीत अचानक उपटला आणि लोकप्रतिनिधींनीही सुरात सूर मिसळविल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कुठल्याही पर्यायांचा विचार न करता थेट वस्त्रांतरगृहच पाडून टाकण्याचा फतवा काढला. मात्र, वस्त्रांतरगृह पाडण्यामागील राजकारणावर आता प्रकाशझोत टाकला जात असून, कुणीतरी ‘बळे-बळे’ कान फुंकत आखाडा परिषदेचे कथित अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या मुखातून तो प्रसवण्याची व्यवस्था केल्याची चर्चा रंगली आहे. अचानक कोसळलेल्या या मुद्यावर अधिकारीवर्गातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, श्री गंगा गोदावरी मंदीर पंचकोठी पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाची इमारत पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला असून, कोणत्याही परिस्थितीत इमारतीला हात लावू दिला जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सिंहस्थविषयक बैठकीत रागकुंडाभोवतालच्या अतिक्रमणाची आणि मंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीची चर्चा सुरू असतानाच महंत ग्यानदास यांनी साधू-महंतांना रामकुंडात स्नानासाठी अडथळा ठरणारी वस्त्रांतरगृहाची इमारत पाडून टाकण्याची सूचना केली आणि उपस्थित आमदारांनीही त्याबाबत माना डोलावत संमती देऊन टाकली.
लोकप्रतिनिधी म्हणतात म्हणून पालकमंत्र्यांनीही कसल्याही चर्चेच्या भानगडीत न पडता वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश देऊन टाकले. अवघ्या मिनिटभरात हा विषय चर्चेला आला आणि कुणालाही मूळ प्रश्न समजायच्या आत त्यावर निर्णयही दिला गेला.
बैठक संपल्यानंतर या निर्णयाचे स्थानिक पुरोहितांमध्ये मात्र तीव्र पडसाद उमटले आणि उपस्थित अधिकारीवर्गातही गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वस्त्रांतरगृहाचा विषय नेमका आला कुठून आणि तो महंतांच्या मुखातून कुणी वदवून घेतला याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या असून, पुरोहित संघाने तर वस्त्रांतरगृह पाडण्याविरोधात दंडच थोपटले आहेत. सद्य:स्थितीत वस्त्रांतरगृहाच्या इमारतीत पुरोहित संघाचे कार्यालय असून, यात्रेकरुंना अल्प दरात लॉकर्सची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.