विकासकामांभोवती राजकारणॅ
By Admin | Updated: February 25, 2017 00:18 IST2017-02-25T00:17:58+5:302017-02-25T00:18:16+5:30
कमळ फुलले : कॉंग्रेस, राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज; प्रस्थापिताना पराभवाचा धक्का

विकासकामांभोवती राजकारणॅ
नितीन बोरसे : सटाणा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बागलाणमध्ये भाजपाला मिळालेले घवघवीत यश कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यासाठी आत्मपरीक्षण करणारे आहे. निवडणूक आली की हरणबारी डावा-उजवा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा, केळझर चारी क्र मांक ८ सह सिंचनासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे राजकारण, घराणेशाही, नोटाबंदीविरोधी प्रचार जनतेच्या पचनी न पडल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बागलाणमध्ये भाजपाचे ‘कमळ’ फुलले आहे. भाजपाला आलेले ‘अच्छे दिन’ हे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला नक्कीच ‘बुरे दिन’चे संकेत ठरणारे आहे. बागलाण तालुक्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाचे नेते, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सटाणा शहराचा पाणीप्रश्न असो, गटारी, बायपास तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित असलेले हरणबारीचा सिंचन प्रकल्प, केळझरचा सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न सुरु केले. त्या तुलनेत राष्ट्रवादीकडे असलेली दीर्घकाळ सत्ता आणि आमदार दीपिका चव्हाण व संजय चव्हाण यांचे मुंबई दरबारी असलेले वजन पाहता सिंचनाचे प्रश्न जैसे थे राहिले. मात्र डॉ. भामरे पाठपुरावा करत असताना नुकत्याच झालेल्या सटाणा पालिका निवडणुकीत भाजपाने आपटी खाल्ली. हा पराजय धोक्याची घंटा समजून डॉ. भामरे यांनी सुरुवातीला पक्षातील डेमेज कण्ट्रोल करत तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांना यशही मिळाले. त्यांनी अवघ्या पंधरवड्यातच सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून घेतला. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेऊन जनतेने या निवडणुकीत भाजपाला मतांचे दान केले आहे. त्यामुळे साहजिकच कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरु ंग लावून भाजपाने सत्ता काबीज केली आहे आहे.
शह-काटशहचे राजकारण भोवले...
बागलाणमधील राष्ट्रवादीचा दीर्घकाळ राहिलेला दबदबा याचे श्रेय संजय चव्हाण यांनाच जाते. मात्र सिंचन योजनांसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे राजकारण केल्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल नाराजी तयार होऊन पालिका निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकवला. या पराभव आत्मपरीक्षण न करता तिकीट काटाकाटीतच त्यांनी धन्यता मानली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांना जायखेडा गटासाठी एकीकडे शब्द दिला जातो आणि दुसरीकडे विकासाचे मॉडेल तयार करणाऱ्या यतीन पगार यांनादेखील बोट लावण्याचे काम केले गेले. या स्पर्धेत अंतिमक्षणी भामरे याचे तिकीट कापून शह-काटशहच्या राजकारणामुळे भामरे यांनी ऐनवेळी कॉँग्रेसमध्ये पक्षांतर केल्याने पक्ष अक्षरश: विखुरला गेला. यतीन पगार यांनी पक्षविरहित मोट बांधून स्वत: किल्ला लढवून ६३३६ इतके मताधिक्क्य मिळवून विजय मिळविला. वीरगाव गटातदेखील पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य वीरेश घोडे यांनी पत्नी वंदना यांच्यासाठी दावेदारी केली. परंतु ऐनवेळी उषा बच्छाव यांना देवळा तालुक्यातून आयात करून घोडे यांचे तिकीट कापले. वास्तविक बच्छाव यांचा या गटाशी कुठलाही संपर्क अथवा संबध नव्हता.
छुपी युती ठरली कुचकामी....
ब्राम्हणगाव गटात सत्ता वाटप करतांना मराठा विद्याप्रसारक समाजाचे उपसभापती डॉ.विलास बच्छाव यांना बाजूला सारण्यासाठी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.मविप्र ,जिल्हा बँक ,बाजार समतिी काबीज करून सत्ता वाटप करण्यासाठी राष्ट्रवादी ,कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार न देता शिवसेनेशी छुपी युती करून जिल्हापरिषद सदस्य प्रशांत बच्छाव यांच्या पत्नी वर्षा यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता.मात्र डॉ.विलास बच्छाव यांनी पत्नी लता बच्छाव यांच्यासाठी विजयश्री खेचून आणण्याचा चंग बांधून रणनीती आखली आणि त्यात ते यशस्वी झाल्याने अनेक राजकारण्यांचे एकप्रकारे मनसुभे उधळून लावले.
सटाणा पालिकेची पुनरावृत्ती.....
शहर विकास आघाडीचे सुनील मोरे या ओबीसी तरु ण चेहऱ्याने पालिकेत एक हाती सत्ता काबीज केली होती. त्याची पुनरावृत्ती ठेंगोडा व पठावे दिगर गटात बघायला मिळाली. ठेंगोडा गटात मीना मोरे या भाजपाची उमेदवारी घेऊन मैदानात उतरल्या होत्या. राष्ट्रवादीकडून संगीता पाटील, कॉँग्रेसकडून सारिका पाटील निवडणुकीला सामोरे गेल्या. पठावेदिगर गट हा आदिवशी बहुल मतदार संघ आहे.यंदा हा गट खुला झाला .या गटात राष्ट्रवादीची चलती होती.मात्र राष्ट्रवादीची हेट्रीक रोखण्यासाठी आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन माजी आमदार लहानू बाळा अहिरे यांचे पुत्र गणेश अहिरे हा एकच उमेदवार दिला.आदिवासींनी एकी दाखवून अखेरच्या क्षणी मतविभागणी टाळण्यासाठी भाजपाचे मन्साराम गावित ,बहुजन समाज पार्टीचे शिवदास सोनवणे हे देखी अहिरे यांना सरेंडर झाल्यामुळे संजय सोनवणे यांना पराभूत केले.
एकट्याने लढविला किल्ला...
सध्या डॉ.सुभाष भामरे भाजपाचे सर्वेसर्वा मानले जातात असे असतांना त्यांनी पक्षाच्या तिकीट वाटाघाटीत हस्तक्षेप न करता पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनीती आखली. याउलट शिवसेनेचे स्टार प्रचारक ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भाजपाच आपला खरा शत्रू म्हणून समोर ठेऊन टीकेची झोड उठविली.मात्र डॉ.भामरे यांनी कोणावरही चिखलफेक न करता सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा राबवून एकट्याने किल्ला लढवला.
कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण
कॉंग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गटबाजीचे ग्रहण लागले आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा पक्ष नेतृत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवून स्वत:ला निष्ठावंत म्हणून मिरविण्यातच धन्यता मानतात. गेल्या दहा दहावर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर चार दशके कॉँग्रेसची चलती राहिली आहे. मात्र त्यानंतर पक्ष संघटनाचा अभाव असल्यामुळे आणि गटबाजीमुळे कॉँग्रेसच्या किल्ल्याची अक्षरश: पडझड झाली आहे.