राजकीय वातावरण ढवळले
By Admin | Updated: November 16, 2015 00:19 IST2015-11-16T00:18:48+5:302015-11-16T00:19:34+5:30
लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाबरोबरच भाजपा प्रवेशाची अनेकांना चाहूल

राजकीय वातावरण ढवळले
लासलगाव : राज्यातील बाजार समितींची संख्या लक्षणीय असल्याने कमी उत्पन्न असलेल्या बाजार समितीचे नजीकच्या सक्षम बाजार समितीत विलीनीकरण करावे, अशी शिफारस राज्यातील आडतविषयक अभ्यास करणाऱ्या समितीने महाराष्ट्र शासनास अहवालात केली असल्याचे समजते. त्यामुळे लासलगाव येथील बाजार समितीचे विभाजन करून निफाड बाजार समिती स्वतंत्र करण्याच्या ठरावाबाबत पुढे काय होणार, याची उत्सुकता आहे.
राज्यात ३०५ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी-विक्री होत आहे. त्यातील मोजक्याच बाजार समितीची आर्थिक उलाढाल चांगली आहे, तर मोठ्या प्रमाणावर बाजार समितींची उलाढाल बेताचीच राहिली आहे. त्यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यावर होणारा खर्च कमी करून बाजार समिती सक्षम करून त्याचा कारभार शासन नियुक्त सचिव केडरमध्ये करण्यासाठी पणन मंडळाचे अधिकारी प्रयत्नात आहेत.
सध्या निफाड तालुक्यातील लासलगाव व पिंपळगाव बसवंत या दोन बाजार समित्या अस्तित्वात असताना तिसऱ्या बाजार समितीच्या निर्मितीस वरिष्ठ शासकीय अधिकारी परवानगी देतात की नाही, याची भविष्यात उकल होणार आहे. तसेच बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे व पंढरीनाथ थोरे यांनी या ठरावाला कडाडून विरोध केला आहे. तसेच दि.३ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना केलेल्या ठरावाच्या काही कायदेविषयक मुद्यांवर चर्चा सुरू केली आहे. बाजार समितीचे विभाजन शासनस्तरावर होणे क्रमप्राप्त आहे. परंतु लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीकरिता शासनाने दि. २२ जानेवारी २०१६ पर्यंत पूर्ण करण्यास मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार की बंद हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
त्याचप्रमाणे दि. ३ नोव्हेंबर रोजी लासलगाव येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, काळजीवाहू संचालक मंडळाचा अधिकार नाही. तसेच विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढीचा आदेश नाही. त्यामुळे करण्यात आलेल्या ठरावाच्या कायदेशीर वैधतेबद्दल कायदेशीर लढाई लढण्यास काही संचालक रविवारी गतिमान झाल्याची चर्चा दिसून आली. या संचालक मंडळाने लासलगाव बाजार समितीचा विभाजन प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष लवकरात लवकर राज्य सरकारकडे नवीन प्रशासकीय मंडळाच्या नियुक्तीसाठी हालचाली गतिमान करीत आहे.
आशिया खंडातील प्रमुख बाजार समिती असा नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समितीचे तिसऱ्यांदा विभाजन होण्याचे संकेत मिळत असून, तसा प्रस्ताव शनिवारी (दि.१४) बाजार समिती संचालक मंडळाने मंजूर केला आहे.
बाजार समिती संचालक मंडळाचीदेखील आता मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ येण्याच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक बैठक शनिवारी (दि.१४) बाजार समितीच्या कार्यालयात सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत विभाजनाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. परिणामी बाजार समिती विभाजनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, बाजार समिती विभाजनाचा प्रस्ताव विषय पत्रिकेत होता. बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे यांनी विभाजनास कडाडून विरोध केला. त्यामुळे उद्या जर बाजार समितीचे विभाजन करण्याचे ठरविले गेले तर ते कसे करणार, यावर बरीच चर्चा झाली असली तरी विधानसभा मतदारसंघनिहाय विभाजन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. तसेच बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ येणार असल्याने भाजपा-सेना कार्यकर्त्यांनी प्रशासनात आपली वर्णी लावण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे.
निष्ठावान भाजपा-शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते व कार्यकर्ते या मंडळात नवीन प्रवेश करणाऱ्यांना सत्ता नजरेसमोर ठेऊन पक्षात येणाऱ्यांना स्थान नको म्हणून जेष्ठ नेत्यांकडे हट्ट करून आहे. प्रशासकीय मंडळ येण्याच्या हालचालींना वेग येऊ लागला असला तरी या यादीत निष्ठावंत नेते व कार्यकर्ते यांचाच समावेश असलेली यादी नव्याने तयार झाल्याची माहिती हाती आली आहे.
विभाजनाने काय साध्य होणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लासलगाव ही व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. परिणामी या बाजार समितीत कांद्याबरोबरच भुसारमाल, भाजीपाला, फळे यांचे लिलाव मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे बाजार समितीच्या उत्पादनात मोठी भर पडते. याउलट असे असतानाही निफाड बाजार समिती स्वतंत्र करण्याचा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल, याबाबत यापूर्वी बाजार समितीच्या माजी संचालकांत दोन परस्पर विरोधी विचार व मतप्रदर्शन व्यक्त केले जात आहे.