न्यायालयाच्या निर्देशाकडे पोलिसांची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:16 IST2017-07-18T00:16:29+5:302017-07-18T00:16:45+5:30
निसाका अपहार : उच्च न्यायालयात फेरयाचिकेची तयारी

न्यायालयाच्या निर्देशाकडे पोलिसांची डोळेझाक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखरविक्री अडीच कोटी रकमेच्या अपहारप्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश देऊनही निफाड पोलिसांनी अद्याप चौकशी न केल्याने यासंदर्भात न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याचा इशारा फोर्स व शेतकरी संघटनेने दिला आहे.
निफाड सहकारी साखर कारखान्यात २००५ मध्ये झालेल्या दहा कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या घोटाळ्यात साखर व्यापाऱ्याने वेळोवेळी १२९ धनादेश देऊन एक लाख ८५ हजार ६९४ क्विंटल साखर उचलली, मात्र व्यापाऱ्याने दिलेले धनादेश खात्यावर पैसे नसल्याच्या कारणाने परत येत होते. अशा परिस्थितीत कारखान्याने काही धनादेश वटण्यासाठी बॅँकेत टाकलेच नाहीत. यासंदर्भात साखर आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांनी संबंधित कामगार व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला, परंतु पोलिसांनी टाळाटाळ केल्याने अखेर शेतकरी संघटना व फोर्स संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने त्याच्या आधारे ४ जुलै २००७ रोजी ९४ बोगस धनादेशची रक्कम दहा कोटी ५८ लाख ९ हजार रकमेच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या नंतर जिल्हा बॅँकेने साखरेच्या साठ्यावर मालतारण कर्ज दिले असल्याने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात व्यापाऱ्याने दिलेल्या १२९ पैकी ३५ धनादेश वटलेले नसल्याचे लक्षात आले. संघटनेने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली.
न्यायमूर्ती अनिल दवे व धर्माधिकारी यांनी यासंदर्भात ११ मार्च २०१० रोजी पोलिसांना पुढील तपासाचे आदेश देत याचिका निकाली काढली. मात्र सात वर्षे उलटूनही पोलिसांनी याबाबत काहीच कार्यवाही केली नाही, परिणामी कारखान्याच्या दोन कोटी ४६ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, शंकर पुरकर, विष्णू ताकाटे, भाऊसाहेब गडाख, के. डी. मोरे, अॅड. नानासाहेब जाधव यांनी दिला आहे.