पोलिसांचा संशय तक्रारकर्त्यांवरच
By Admin | Updated: April 26, 2015 00:52 IST2015-04-26T00:48:03+5:302015-04-26T00:52:17+5:30
पोलिसांचा संशय तक्रारकर्त्यांवरच

पोलिसांचा संशय तक्रारकर्त्यांवरच
नाशिक : वाडीवऱ्हे शिवारात वाहन अडवून ५८ किलो सोने लूट प्रकरणात घडलेला घटनाक्रम व तक्रारकर्त्यांनी कथन केलेली घटना पाहता, पोलिसांना तक्रारकर्त्यांवरच संशय असून, त्याचाच आधार घेत, सोने वाहून नेणाऱ्यांची गोपनीय चौकशी केली जात आहे. सोने लूट घटनेत अनेक अनुत्तरित प्रश्नच पोलिसांना भेडसावित असल्यामुळे या गुन्'ाच्या मूळ तपासावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा पोलिसांनी तक्रारकर्त्या वाहनचालक, सुरक्षारक्षक यांचीच कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या मते सोने वाहून नेणाऱ्या मोटारीची दरोडेखोरांना टीप असल्याशिवाय ही घटना जशी घडू शकत नाही, तसेच दरोड्याचा बनावच करायचा होता तर कसारा घाटात सोने लुटणे दरोडेखोरांना सर्वाधिक सोपे असताना त्यांनी वाडीवऱ्हे शिवारच का निवडले असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. याशिवाय सुरक्षारक्षकांचे हातपाय बांधेपर्यंत त्यांनी कोणतीही क्रिया वा प्रतिक्रिया का व्यक्त केली नाही, अथवा जवळ शस्त्र असतानाही दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही. खरे खुऱ्या दरोडेखोरांनी सोने लुटल्यानंतर पुरावाच नको म्हणून मोटारीतील एकाही व्यक्तीला जिवंत ठेवले नसते, या घटनेत निव्वळ पिस्तुलाचा धाक दाखवूनही इतक्या मोठ्या रकमेचा ऐवज चोरून नेण्याइतके धाडस दरोडेखोरांनी कशाच्या आधारे केले असा सवालही उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचे सोने वाहून नेण्याची मोठी जोखीम पत्करताना खासगी सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी पोलीस बंदोबस्त मागवूनही त्याची वाहतूक करणे सोपे असताना दोन रक्षकांवर इतका भरवसा कसा असू शकतो या दृष्टीनेही पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित केले आहे. या साऱ्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर पोलिसांना मिळत नसल्यामुळे त्यांनी तक्रारकर्त्यांची चौकशी करतानाच त्यांचा पूर्वइतिहास, त्यांनी शुक्रवारी दिवसभर केलेले फोन कॉल्सचे रेकॉर्ड तपासून कोणा कोणाशी संपर्क साधला याची माहिती घेतली जात आहे. ज्यांच्यावर अधिक संशय आहे, त्यांच्या बॅँक खात्याचे रेकॉर्डही मागविण्यात आले आहे.