पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन् सक्तीची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST2020-12-24T04:15:15+5:302020-12-24T04:15:15+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३च्या कलम-१४४ (१) व (३) ...

पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन् सक्तीची नाकाबंदी
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३च्या कलम-१४४ (१) व (३) अन्वये रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (मनाई आदेश) लागू केली आहे. बुधवारपासून येत्या ५ जानेवारीपर्यंत आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या आदेशाचे पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार आहे. याप्रकरणी पोलिसांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर प्रत्येकाने मास्क लावणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित दोन फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. पान, गुटखा, तंबाखूसेवन व मद्यप्राशन, धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिकरीत्या पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहे. प्रवास करताना तसेच कामाच्या ठिकाणीसुध्दा मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकण्यावरसुध्दा बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ वाजेनंतर चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर घोळक्याने फिरताना किंवा गप्पा मारताना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
--इन्फो--
संचारबंदी अंमलबजावणीचे सक्तीचे आदेश
रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ‘अ’ पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेड्सचा वापर करून नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपापल्या हद्दीत करत ‘नाइट कर्फ्यू’चे उल्लंघन करताना कोणीही आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम-१८८नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.