पोलिसांचा कानाडोळा : त्रस्त नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By Admin | Updated: March 22, 2015 23:39 IST2015-03-22T23:38:55+5:302015-03-22T23:39:03+5:30
पंचवटीत कुंटणखान्याबरोबरच अमलीपदार्थांचा व्यवसाय

पोलिसांचा कानाडोळा : त्रस्त नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
नाशिक : सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंचवटीतील एका रहिवासी क्षेत्रात कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे़ विशेष म्हणजे याची तक्रार करणाऱ्यास या गुंडांकडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली जाते आहे़ पोलिसांचा वरदहस्त व गुंडांमध्ये भरडल्या गेलेल्या स्थानिक रहिवाशांनी जिवाची भीती बाजूला सारत अखेर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांना निनावी पत्र पाठवून आपली कैफियत मांडली आहे़
विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, दरोडा, जबरी लूट, विनयभंग, खंडणी अशा स्वरूपाचे वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांनी एकत्र येऊन पंचवटीतील रासबिहारी शाळेमागील मुंबई-आग्रावरील एका फार्ममध्ये सुमारे पंधरा-वीस बांगलादेशी व स्थानिक अल्पवयीन मुली आणून देहविक्री व अमली पदार्थ व्यापार सुरू केल्याचे या पत्रात म्हटले आहे़
या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही़
या सराईत गुन्हेगारांशी स्थानिक पोलीस व अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध मजबूत असल्याने कारवाई केली जात नाही याउलट नागरिकांनाच धमकावून गप्प केले जाते़ या अनैतिक धंद्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून खुनाचे प्रकारही घडल्याचे या पत्रात म्हटले आहे़
या अवैध धंद्यांमुळे परिसरातील महिला, मुली, तरुणी व नागरिकांचे घराबाहेर फिरणे धोकेदायक बनले आहे़ अमली पदार्थाच्या नशेतील माणसं तरुणींचा विनयभंग करतात याची तक्रार करण्यास गेल्यास हे गुन्हेगार नागरिक व महिलांना बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत असल्याचे पत्रात नमूद आहे.
या परिसरातील कुंटणखाना व अमलीपदार्थांचा व्यापार बंद करण्याची मागणी येथील त्रस्त रहिवाशांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निनावी पत्राद्वारे केली आहे़ (प्रतिनिधी)