संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

By Admin | Updated: September 29, 2014 00:44 IST2014-09-29T00:43:52+5:302014-09-29T00:44:08+5:30

लक्ष्मण महाडिक : ‘तहानलेलं पाणी’चे प्रकाशन

Poetry collection | संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

नाशिक : संवेदना जपल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो आणि जगण्याची व लिखाणाची गोष्ट एकच असते, ती म्हणजे मनाचा सुरू असलेला संघर्ष. निसर्गाने ओढ दिल्यानंतर बळीराजाच्या मनाच्या व्यथांची जाणीव ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहातून होते, असे प्रतिपादन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले.
गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात कवी मारुती सावंत लिखित ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शब्दांची गुंफण करत कवी आपल्या कविता पूर्ण करत असतो. यादरम्यान त्याचा आपल्या मनाशी संघर्ष सुरू असतो. जेव्हा एखाद्या कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित होतो, तेव्हा त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. आपली कविता जनसामान्यांच्या हातात पडते तेव्हा कवीला होणारा आनंद हा गगनात मावेनासा असतो. याप्रसंगी व्यासपीठावर सावंत यांच्या मातोश्री सरस्वती सावंत, पी. एम. वाकडे, जी. जी. सोनार, विष्णू गोरे, शीतल सावंत, मारुती सावंत उपस्थित होते. सावंत यांनी लिहिलेल्या कवितांमधून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सावंत यांनी काव्यसंग्रहातील काही कविता सादर करून उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Poetry collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.