वीरपत्नींना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल
By Admin | Updated: January 8, 2017 01:23 IST2017-01-08T01:23:34+5:302017-01-08T01:23:48+5:30
वीरपत्नींना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल

वीरपत्नींना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल
नाशिक : विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गावाहिनीतर्फे देशभरातील वीरपत्नींना नोकरी, आर्थिक मोबदला आदि गोष्टी मिळाव्यात यासाठी मिनिस्ट्री आॅफ पर्सनल, पब्लिक ग्रिव्हनेस अॅण्ड पेशन्स यांच्याकडे आॅनलाइन याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती दुर्गावाहिनीच्या संयोजक अॅड. मीनल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वीरमरण प्राप्त झालेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या पत्नींची आर्थिक अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक असून, त्यांना व त्यांच्या मुलांना उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनास आले आहे. बहुतांशी वीरपत्नी या सुशिक्षित असून, संरक्षण खात्यात विविध विभागांत त्या चांगल्याप्रकारे काम करू शकतात. पती शहीद झाल्यानंतर बऱ्याचवेळा सासरकडील मंडळी कोर्टात केस दाखल करतात व मिळणारा फंड घेऊन सून-नातवंडांना वाऱ्यावर सोेडून मोकळे होतात. त्यामुळे या वीरपत्नींना रहायला जागा, उदरनिर्वाहाचे साधन या दोन्ही गोष्टींच्या अभावी हलाखीत दिवस काढावे लागत आहे.
शासन रेल्वे अथवा बस अपघात झाला, तर पीडितांना व त्यांच्या परिवाराला नोकरी व पैसे दोन्ही उपलब्ध करून देतात. मग देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरपत्नींना सरकारी नोकरीत आरक्षण का मिळू नये, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यातील २२० वीरपत्नींनी दुर्गावाहिनीक डे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची तक्रार केली असून, देशभरातील अन्यायपीडित वीरपत्नींची संख्या वाढण्याची शक्यता यावेळी बोलून दाखविण्यात आली. वीरपत्नींना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने त्यांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.