पिळकोस-कळवण रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: September 6, 2016 22:09 IST2016-09-06T22:08:38+5:302016-09-06T22:09:10+5:30
राज्य महामार्ग क्रमांक १७ : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; प्रवाशांत संताप

पिळकोस-कळवण रस्ता बनला मृत्यूचा सापळा
संतोष वाघ पिळकोस
वेळ : दुपारी १२ वाजेची.
स्थळ : पिळकोस ते कळवण रस्ता
सटाणा-कळवण-मांगबारी-पिळकोस -कळवण या राज्य महामार्ग क्रमांक १७ची पिळकोस ते कळवण या दहा किमी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दोन महिन्यांपासून हा रस्ता एका बाजूला खचला जात असल्याने अपघात होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
या मार्गावर आजवर पाच ते सहा वाहनचालकांना जीवही गमवावा लागला आहे. पिळकोस ते कळवण या दहा किमी अंतरावरील प्रवास जीवघेणा ठरू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ, शाळकरी मुले, शेतकरीबांधव व व्यवसाय/ नोकरीनिमित्त दररोज ये-जा करणारा नोकरदारवर्ग व चाकरमानी यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रचंड संताप होत आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण व बगडू गावातील ग्रामस्थांनी केली आहे. अनेक दिवसाच्या मागणीकडे संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिळकोस, जुनी बेज, नवी बेज, भादवण, बगडू या गावांतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयी आपली कैफियत मांडणार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
सटाणा-पिळकोस मार्गे कळवण या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची पूर्णत:
चाळण झाली आहह. पिळकोस ते कळवण हा दहा किमीचा रस्ता डाव्या बाजूचा एक ते दीड फूटखचला गेल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेकवेळा लहान-मोठे अपघातही झाले आहेत यात आतापर्यंत पाच ते सहा वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.
हा राज्य महामार्ग ज्या वेळेस तयार झाला त्यावेळेस पिळकोस ते कळवण दरम्यान अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मर्जीतील ठेकेदाराकडून सदर रस्त्याचे काम करून घेतले आहे. त्यामुळे रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
पिळकोस-कळवण रस्त्याच्या दुर्दशेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार असून, रस्त्याच्या कामाची विभागीय चौकशी होऊन दोषींवर दंडात्मक व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शीतलकुमार अहिरे, शांताराम जाधव, अशोक पवार, साहेबराव जाधव, कैलास पाटील, नीलेश जाधव, राहुल सूर्यवंशी, बाळासाहेब अहेर, उत्तम मोरे, मंगेश आहेर, राहुल आहेर, केवळ वाघ, मुरलीधर वाघ, निवृत्ती जाधव, दादाजी जाधव, सचिन वाघ, बुधा जाधव, हंसराज वाघ आदिंसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.