विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या
By Admin | Updated: March 31, 2017 00:45 IST2017-03-31T00:45:11+5:302017-03-31T00:45:22+5:30
नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली.

विरोधकांच्या गोंधळातच ‘स्थायी’च्या नियुक्त्या
नाशिक : महापालिका स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया विरोधकांनी घातलेल्या गोंधळातच महापौर रंजना भानसी यांनी पार पाडली. स्थायी समितीवर भाजपाचे ९, शिवसेनेचे ४ तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीही भाजपाच्या ताब्यात असणार आहे. दरम्यान, शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने विरोधकांकडून वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु महापौरांनी त्यास दाद न देता नियुक्तीप्रक्रिया पूर्ण केली. महापालिका स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महापौरांनी विभागीय आयुक्तांकडून आलेल्या गटनोंदणीच्या पत्रांनुसार गटनेत्यांची निवड जाहीर केली. त्यात शिवसेनेचे विलास शिंदे, भाजपाचे संभाजी मोरुस्कर, कॉँग्रेसचे शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेचे सलीम शेख यांची गटनेतापदी निवड करण्यात आली. तत्पूर्वी, कॉँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षांनी आपल्या सदस्यांच्या नियुक्तीसंबंधीचे पत्र नगरसचिवांकडे सुपूर्द केले होते. त्यामुळे पत्र देण्यासाठी कॉँग्रेसला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसचे शाहू खैरे यांनी आपली आताच गटनेतापदी निवड झाली असल्याने चर्चा करण्यासाठी अर्धा तासाची मुदत मागितली. त्यानुसार, महापौरांनी आणखी दहा मिनिटांचा अवधी देत तोपर्यंत महासभा तहकूब केली. दहा मिनिटांनंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले असता राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी रिपाइंच्या एकमेव सदस्या दीक्षा लोंढे यांचा कोणाच्या गटात समावेश केला आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांची स्वतंत्र नोंदणी झाली असेल तर रिपाइंच्या गटनेतापदी निवड करण्याची सूचना केली. परंतु, नगरसचिव ए. पी. वाघ यांनी महसूल आयुक्तांकडून आलेल्या पत्रानुसारच गटनेत्यांची निवड केली असल्याचा खुलासा केला.