पीक नियोजन कोलमडले

By Admin | Updated: June 24, 2014 00:35 IST2014-06-23T23:34:10+5:302014-06-24T00:35:19+5:30

सायगाव : येवला तालुक्याच्या दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे.

Peak planning collapses | पीक नियोजन कोलमडले

पीक नियोजन कोलमडले

सायगाव : येवला तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ पाठ सोडायला तयार नसून, १९७२च्या दुष्काळापासून कमी-अधिक पर्जन्यमानावर, निसर्गाच्या लहरी-पणावर हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांची सतत घोर निराशाच झाली आहे. अत्यल्प पावसामुळे कधी खरीप तर कधी रब्बी हंगामातील पिके करपली. यंदाही पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गतवर्षाचे रोगट हवामान, बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने झोडपलेला शेतकरी कसाबसा सावरून नव्या खरीप हंगामाच्या तयारीला लागला. शेतीची सर्व मशागत आटोपून पाऊस पडला की लागवड करायची. हारलेला डाव पुन्हा खेळायचा ! पण रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरीही पाऊस नाही. हवामान खाते व पंचांग तसेच निसर्गातील अनेक ढोबळ संकेतानुसार पुढेही एक महिना पाऊस पडेल तर तो सरासरी किती पडेल, हेही निसर्गाच्याच स्वाधीन असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पीककर्ज काढून जमिनीची मशागत व बियाणे खरेदी करून बसलेला शेतकरी आज आभाळाकडे डोळे लावून आहे. खरीप हंगामासाठी रोहिणी, मृग व आर्द्रा ही तिन्ही नक्षत्रे योग्य असतात. या काळात पिकांची लागवड झाल्यास पिके शेवटपर्यंत तग धरतात. रोगाला बळी पडत नाही. उत्पादनही चांगले येते, परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. मात्र रोहिणी आणि मृग कोरडी गेली. आर्द्रा नक्षत्राच्या तोंडावर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे स्वप्न भंगण्याच्या मार्गावर आहे.
उशिरा पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना कपाशी, मका, बाजरी आदि पिकांचे उत्पादन कमी मिळणार आहे. खरीप हंगामातील कांदा लागवडही लांबणार आहे. एकूणच शेती अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होणार आहे. पावसाळा लांबल्याने पीक लागवडीचे आराखडेही बदलणार आहे. कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीला अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकरी प्राधान्य देतात. मका पिकाचे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.
पावसाअभावी सर्वत्र बाजारपेठा ओस पडल्या आहे. ग्रामीण भागातील रोजगार थंडावल्यामुळे प्रत्येक जण हात आखडूनच काटकसर करत आहे. गेलेला पाऊस आषाढी एकादशीला येईल. ही आशा उरी बाळगून शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: Peak planning collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.