जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:06+5:302021-09-06T04:18:06+5:30

४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२१ रोजी पर्युषण पर्व साजरे केले जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...

Paryushan Parvas of Jains started | जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वास प्रारंभ

जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वास प्रारंभ

४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२१ रोजी पर्युषण पर्व साजरे केले जाईल. त्यानिमित्त जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. हे पर्व आठ दिवस चालते. त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे समाजबांधव हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ‘दसलक्षण’ या नावाने संबोधतात.

आत्म्याची शुद्धी करून योग्य उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे, हा उद्देश हा पर्व साजरे करण्यामागे आहे. पर्यावरणाप्रति आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी ‘कल्पसूत्र’ या तत्त्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा-अर्चा, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सानिध्यात घालविला जातो. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो. संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला जातो. मंदिर परिसरात अधिक वेळ घालवणे हे शुभ मानले जाते. हजारो लोक काहीही न खाता निरंकार उपवास करतात. भारताशिवाय इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी व इतर देशांतही हा सण आनंदाने साजरा केला जातो.

या पर्वातील क्षमावाणीच्या कार्यक्रमामुळे जैन धर्माशिवाय इतर समाजातील लोकही त्यापासून प्रेरणा घेतात. विश्व-मैत्रीच्या दिवशी हा पर्व साजरा केला जातो. गणेश चतुर्थी किंवा ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरी पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक उपवास करून कुकर्मापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतात. त्याचबरोबर सर्व सजीवांची क्षमा मागून आपले कुणाशीही वाईट नसल्याचे दर्शवितात. पर्यावरणात आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही असा संकल्प करतात. क्षमा-भाव हा याचा मूलमंत्र आहे. जैन परंपरेतला ‘मिच्छामी दुक्कडम’ हा एक उत्तम संस्कार मानला जातो.

इन्फो

काय आहे ‘मिच्छामी दुक्कडम’

मिच्छामी दुक्कडम म्हणजे आपल्या हातून कळत-नकळत काही चुका घडल्या असतील, कळत नकळत तुमच्यामुळे कुणी दुखावले असेल तर आपण आपले कुटुंबीय, नातेवाईक मित्र यांची क्षमायाचना मागितली पाहिजे, अशी प्रथा जैन धर्मात आहे. मिच्छामी दुक्कडम असे त्याला संबोधले जाते. पर्युषण काळात मिच्छामी दुक्कडमचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Web Title: Paryushan Parvas of Jains started