पोपट मेलाच आहे, पण सांगायचे कुणी?
By Admin | Updated: January 14, 2017 00:49 IST2017-01-14T00:49:39+5:302017-01-14T00:49:51+5:30
नाशकात युती नाहीच : सेना - भाजपा स्वबळावर लढण्यास ठाम

पोपट मेलाच आहे, पण सांगायचे कुणी?
नाशिक : नाशिक शहरात सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळीच सेना-भाजपा युतीचा पोपट मेला आहे, पण आता २०१७ च्या निवडणुकीतही तो थडग्यातून पुन्हा उकरून काढत अर्धमेला झाला आहे, निपचित पडलेला आहे, असे सांगत युतीबाबत सेना-भाजपात एकमेकांना झुलवत ठेवले जात आहे. राज्यस्तरावर युतीबाबत खलबते सुरू असली तरी नाशिकमध्ये महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यास सेना-भाजपा ठाम आहे. फक्त युतीच्या या साऱ्या चर्चेत पोपट कधीच मेला आहे, हे सांगायचे कुणी, हा खरा प्रश्न आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती होईल की नाही, या प्रश्न राज्यस्तरावर सर्वत्र चर्चिला जात असला तरी नाशिकमध्ये मात्र उभय पक्षांनी स्वबळावर लढण्याची मनोमन तयारी करून ठेवली आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत युती तोडण्यास भाजपानेच पुढाकार घेतला होता आणि संघटनशक्ती वाढविण्यासाठी हीच संधी असल्याचे वरिष्ठ स्तरावर पटवून देत भाजपा स्वबळावर लढली होती. त्यावेळी १२२ ठिकाणी उमेदवार देताना सेना-भाजपा या दोन्ही पक्षांची दमछाक झाली होती. निवडणुकीत भाजपाने आपल्या १४ जागा राखल्या होत्या, तर सेनेचे संख्याबळ कमी होऊन ते २२ वर आले होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सेना-भाजपातील विस्तव गेला नाही आणि एकमेकांना विरोध करण्यातच उभयतांनी शक्ती खर्च केली. आता २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी सेना - भाजपाने स्वबंळावर लढण्याची पूर्ण तयारी चालविली आहे.