सरपंच आरक्षण सोडत लांबल्यामुळे पॅनलप्रमुखांची हवा गूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:09 IST2020-12-24T22:05:05+5:302020-12-25T01:09:18+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरपंच आरक्षण सोडत लांबल्यामुळे पॅनलप्रमुखांची हवा गूल!
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीन गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सर्व राजकीय समीकरणेच बदलणार असल्याने पॅनलप्रमुखांची हवा गूल झाली आहे. भावी सरपंच कोण, याची शाश्वती नसल्याने निवडणुकीच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वी होणार असे जाहीर झाले होते. त्यामुळे पॅनलप्रमुख व इच्छुक निर्धास्त होते. आपण किंवा आपल्याच गटातील उमेदवार सरपंच होणार या आविर्भावात अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. गावाचा कारभार आपल्या हाती येणार म्हणून काहींनी पैशांची जुळवाजुळवदेखील केली होती. आपल्या पॅनलमध्ये कोणते उमेदवार असावेत, कोण सरपंच व उपसरपंच असावा याचीही निश्चिती करून ठेवली होती. कोणत्या वॉर्डात कोण निवडून येणार, उमेदवारांची मते किती, किती मते बाहेर गेलेली, वॉर्डात किती मते आपली, किती मते विरोधकांना पडतील, विरोधकांचा प्रभाव किती, या सर्व गोष्टींचा अभ्यास पॅनलप्रमुखांनी दोन महिन्यांपासून केला होता. मात्र, सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याचे जाहीर केल्याने पॅनलप्रमुख थंडगार पडले आहेत.
आता निवडणूक लढताना खर्च कोणी करायचा, हा मोठा प्रश्न उमेदवारापुढे उभा राहिला आहे. आरक्षणामुळे पॅनलप्रमुख द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे पॅनल करतानाही अनेकजण आता डळमळीत होताना दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेले अनेक कार्यकर्ते सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्याने हिरमुसले असून, पुन्हा तेच आरक्षण निघते की नव्याने दुसरे आरक्षण काढण्यात येते, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधितांकडून खर्चाबाबत आखडता हात घेतला जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
गावगाड्यातील गप्पा रंगल्या सोशल मीडियावर
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. गाव विकासाचा गंध नसणारेही सध्या विकासाच्या गप्पा मारताना दिसत आहेत. अनेक युवक सोशल मीडियावर टीका-टिप्पणी करीत आहेत. अशा लोकांना जनता किती थारा देईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.