‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन
By Admin | Updated: December 28, 2014 01:58 IST2014-12-28T01:57:52+5:302014-12-28T01:58:22+5:30
‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन

‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक : राग गात असताना शिष्याचे त्याकडे किती लक्ष आहे याची चाचपणी़़़शिष्याच्या चांगल्या गायनाला उत्स्फूर्त दाद़़़अन् चुकल्यास आकारात गाण्याचा तितकाच प्रेमळ सल्ला गुरुजी अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी देत असत़ पंडितजींकडे संगीत शिकण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे अशा भावना त्यांचे शिष्य चंद्रकांत नाईक, शेखर कुंभोजकर, मकरंद हिंगणे यांनी व्यक्त करून तयांची गायकी व आठवणींना उजाळा दिला़ संस्कार भारती व रवि नांदुर्डीकर यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे ‘स्वरविभास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने झाली़ यानंतर त्यांच्या शिष्यांनी तम् भवललाट, रागमाला, यमन रागातील हरवा मोरा, झपातलमधील तराना, दु्रत बंदिशमध्ये जानी तोरे, संगीत रस सुरस, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, घेई छंद, मकरंद, प्रिय हा मिलिंद, छेडून गेले मधुर स्वरविमल, हे नंदलाला, मुरलीधर श्याम सादर केले़ याबरोबरच आधी रचिली पंढरी, हरिभजनाविण काळ घालवू नको रे, आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण, अबीर गुलाल उधळीत रंग, परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले, संहारुनी अरी रघुकुल दीपक आपल्या सुरेल आवाजात सादर केले़ यावेळी पंडितजींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य नाईक, कुंभोजकर व हिंगणे यांनी सादर केलेल्या गाण्यांना तबल्यावर दत्तात्रय भावे, अनिल दैठणकर (व्हायोलिन), दिंगबर सोनवणे (पखवाज) यांनी संगीतसाथ केली़ कार्यक्रमाचे निवेदन रवि नांदुर्डीकर यांनी केले़ यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)