भोजापूरजवळील जलसेतूचे काम अपूर्ण
By Admin | Updated: May 23, 2014 00:34 IST2014-05-22T23:51:36+5:302014-05-23T00:34:48+5:30
सचिन सांगळे ल्ल नांदूरशिंगोटे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून भोजापूर धरणाजवळ उभारण्यात आलेल्या जलसेतू पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.

भोजापूरजवळील जलसेतूचे काम अपूर्ण
सचिन सांगळे ल्ल नांदूरशिंगोटे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून भोजापूर धरणाजवळ उभारण्यात आलेल्या जलसेतू पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे. जलसेतू पुलाचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. भोजापूर धरणाजवळ म्हाळुंगी नदीवर कालव्याचे पाणी वाहून नेण्यासाठी जुना पूल तोडून नवीन जलसेतू बांधण्यात आला. वहनक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सुमारे १०५ मीटर लांबीच्या पुलासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झाला. मात्र अद्याप काही ठिंकाणी या पुलाचे काम अपूर्ण आहे. गेल्या वर्षापासून कालव्याद्वारे या नव्या जलसेतूवरून पाण्याचे आवर्तन सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. मात्र पहिल्याच आवर्तनाच्या वेळी भराव खचल्याने आवर्तन बंद करण्याची नामुष्की पाटबंधारे विभागावर आली होती. थोडीफार डागडुजी केल्यानंतर आवर्तन पूर्ववत करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जलसेतूची गळती ‘जैसे थी’ होती. लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी जावे व कालव्याची वहनक्षमता वाढावी या उद्देशाने जलसेतू बनविण्यात आला होता. मात्र त्याची गळती रोखण्यात पाटबंधारे खात्याला अपयश आल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. जलसेतूचे काम पूर्ण होत नसल्याबद्दल कालवा लाभक्षेत्रातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सदर कामाची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम. के. पोफळे यांनी गेल्या आठवड्यात भेट दिली. यावेळी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केली. त्याचबरोबर नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्याचे समजते.