अवघे दोन हजार पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

By Admin | Updated: November 17, 2015 23:18 IST2015-11-17T23:16:57+5:302015-11-17T23:18:12+5:30

बारावी : नाशिक विभागाचा निकाल २० टक्के

Only two thousand retired candidates qualify | अवघे दोन हजार पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

अवघे दोन हजार पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेसाठी एकूण दहा हजार १३६ पुनर्परीक्षार्थी नाशिक विभागातून बसले होते. त्यापैकी अवघे दोन हजार १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. त्यामुळे विभागाचा निकाल केवळ १९.२० टक्के इतका लागला. तर नाशिक शहराचा १६.३० टक्के इतका निकाल लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.
नाशिक विभागीय मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण २९ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेसाठी दहा हजार ३४४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता; मात्र दहा हजार १३६ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. त्यापैकी केवळ दोन हजार १७ विद्यार्थी विभागातून उत्तीर्ण होऊ शकले. परिणामी राज्यात नाशिकचे स्थान सर्वांत खाली घसरले आहे. एकूणच पुनर्परीक्षार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाशिक विभागात गटांगळ्या खाल्ल्याने निकालावर परिणाम झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातून पाच हजार ७४१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. धुळे येथून दोन हजार ७८४ पैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने केवळ १९.६९ टक्के निकाल लागला. तसेच नंदुरबारमधून केवळ ९०० पुनर्परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली व त्यापैकी ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने नाशिक विभागात सर्वाधिक ३५.५६ टक्के इतका नंदुरबारचा निकाल लागला.
निकालाचा घसरता आलेख
बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेची विभागाची टक्केवारी गेल्या दोन वर्षांपासून घसरत आहे. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींचे गटांगळ्या खाणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. २०१३ साली बारावीच्या आॅक्टोबर परीक्षेचा निकाल २५.१२, तर २०१४ साली २४.३६ टक्के इतका लागला होता.

Web Title: Only two thousand retired candidates qualify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.