केवळ उद्दिष्टपूर्तीचा अट्टहास
By Admin | Updated: January 9, 2017 01:34 IST2017-01-09T01:34:38+5:302017-01-09T01:34:53+5:30
अशास्त्रीय वृक्षारोपण : दहा फुटांच्या हजारो रोपांच्या लागवडीचा पालिकेने मांडला ‘देखावा’

केवळ उद्दिष्टपूर्तीचा अट्टहास
अझहर शेख ल्ल नाशिक
दहा फुटांचे २१ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने निवडलेल्या कंपन्यांकडून आटापिटा केला जात आहे. शहरात जरी युद्धपातळीवर वृक्षारोपण केले जात असल्याचे दृश्य नाशिककरांच्या नजरेस पडत असले तरी हे दृश्य चिरकाल ‘हरित’ दिसणारे असेल का? याबाबत साशंकता आहे. कारण उद्दिष्टपूर्तीसाठी वृक्षारोपणाच्या शास्त्रीय पद्धतीला संबंधितांकडून छेद दिला जात आहे.
महापालिकेकडून शहरात २१ हजार रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला गेला असून, त्यापैकी ११ हजार रोपे अवघ्या आठवडाभरातच लावून ठेकेदारांनी डोक्यावरचा भार खांद्यावर आणून ठेवला आहे; मात्र हा भार कमी करताना ज्या हेतुसाठी वृक्षारोपण केले जात आहे, किमान तो हेतू साध्य होणार का? याचा विचार संबंधितांनी केला नाही. शहराचे पर्यावरण टिकून रहावे आणि हरित नाशिक, स्वच्छ प्रदूषण मुक्त नाशिक’ निर्माण व्हावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षारोपणासाठी कोट्यवधींचा खर्च उचलला आहे; मात्र ज्या पद्धतीने शहरात विविध भागांमध्ये अद्याप रोपांची लागवड करण्यात आली आहे ती पद्धत अत्यंत ‘क्रूर’ अशीच म्हणावी लागेल असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. जागेची अयोग्य निवड, रोपांभोवतालच्या प्लास्टिकच्या पिशव्यांसह लागवड, उच्च दाबाच्या वीजतारांखाली लागवड, रोपाच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचा ‘जेसीबी’ने केले जाणारे खड्डे, रिंगरोडच्या कडेला थेट पाथवेलाच खेटून खोदलेले खड्डे, रोपांभोवती आळे नाही, अशा थातूरमातूर व पूर्णत: चुकीच्या पद्धतीने क रण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे २१ हजारांपैकी किती रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होईल, हा आगामी काळात संशोधनाचा विषय ठरणार आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारांना योग्य समज देऊन शास्त्रीयदृष्ट्या वृक्ष लागवडीची अट बंधनकारक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.