कांदा गडगडला
By Admin | Updated: September 8, 2016 00:45 IST2016-09-08T00:44:41+5:302016-09-08T00:45:19+5:30
येवला : शेतकरी हवालदिल

कांदा गडगडला
येवला : सलग तीन दिवस येवला बाजार समितीत कांदा लिलाव सुटीमुळे बंद होते. बुधवारी कांदा मार्केट खुले झाले. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली तर अंदरसूल मार्केटला तीन हजार क्विंटल कांदा आला. दोन्ही मार्केटला कांद्याच्या भावात बुधवारी १२५ रुपयाने कांदा गडगडला. त्यामुळे ग्राहक वर्गाला ४ रु पये ते ६ रु पये प्रतिकिलो भाव मिळत असला तरी शेतकरी मात्र आगीतून उठून फुफाट्यात पडला आहे.
येवला मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव केवळ किमान १५० रुपये ते ६२३ तर सरासरी ४२५ रुपये क्विंटल भाव होते. अंदरसूल मार्केट यार्डवर कांद्याची आवक दोन हजार क्विंटल झाली. भाव किमान २०० ते ६४६ पर्यंत तर सरासरी ४०० रुपये क्विंटल होते. कांद्याच्या भावात निरंतर घसरण चालू आहे.
राज्यासह देशांतर्गत व परदेशात स्थानिक पातळीवर कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे कांदा भावात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती औजारे व मजुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च ८०० रुपये प्रतिक्विंटल झाला. एप्रिलमध्ये साठवलेला कांदा गेल्या चार महिन्यात ६० टक्के घटल्याने आता उरलेल्या ४० टक्के कांद्याला केवळ १२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी संतापला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? शेतकऱ्यांचे नुकसानच करायचे का, असा संतप्त सवाल शेतकरी बाजार आवारात विचारीत होते.
कांदा उत्पादनासाठी आलेला खर्च, विविध संस्थाकडून तसेच बँकांकडून घेतलेल्या
कर्जाची परतफेड कशी
करायची, याची चिंता कांदा उत्पादकांना सध्या सतावत आहे. (वार्ताहर)