कांदा उत्पादकांना फटका

By Admin | Updated: August 8, 2016 23:07 IST2016-08-08T22:23:45+5:302016-08-08T23:07:39+5:30

सरदवाडी : चाळीत शिरले पुराचे पाणी

Onion growers hit | कांदा उत्पादकांना फटका

कांदा उत्पादकांना फटका

सरदवाडी : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे शिवनदीला महापूर आला होता. पुराचे पाणी शेतांमध्ये साठल्याने कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धरण पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरून मिटरभर उंचीने पूरपाणी वाहत असतानाही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती पुराच्या पाण्यात बुडाल्याचे चित्र होते. संपूर्ण एक दिवस व एक रात्र पूर पाणी शेतांमध्ये साठून होते. येथील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळी शेतांमध्येच असल्याने साठलेल्या पूर पाण्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. धरणापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मण पांडुरंग लाटे यांची कांदा चाळ आहे. शिवनदीला आलेल्या महापुरामुळे लाटे यांच्या कांदाचाळीत पाणी शिरले होते. चाळीत १७ ट्रॅक्टर कांदे लाटे यांनी साठवून ठेवले होते. २४ तासाहून अधिक काळ मिटरभर उंचीने पाणी चाळीत राहिल्याने लाटे यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सरदवाडी धरण ओव्हर फ्लो झाल्याने स्मशानभूमी परिसर जलमय झाला होता. त्यातच स्मशानभूमीलगतचा पूल पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे.

Web Title: Onion growers hit