खामखेडा परिसरात पावसामुळे कांदा लागवडीस वेग
By Admin | Updated: September 22, 2015 22:42 IST2015-09-22T22:41:46+5:302015-09-22T22:42:13+5:30
खामखेडा परिसरात पावसामुळे कांदा लागवडीस वेग

खामखेडा परिसरात पावसामुळे कांदा लागवडीस वेग
खामखेडा : उत्तराच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने व नदी-नाल्यांना पाणी आल्यामुळे परिसरात कांदा लागवडीस वेग आला आहे. चालू वर्षी सुरुवातीला दिंडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी अल्पशा पाण्यावर कांद्याचे बियाणे टाकले होते. परंतु पाऊस न पडल्यामुळे बियाण्याची उगवण कमी प्रमाणात झाली. काही बियाण्याची उगवण चांगली होऊन कांद्याची रोपे लागवडीयोग्य झाली होती.
परंतु पाऊस न पडल्यामुळे रोपे पाण्याअभावी जळून गेली, तर काही शेतकऱ्यांनी निदान बियाण्याचे पैसे मिळतील म्हणून मिळेल त्या भावामध्ये विकून टाकली. परंतु काही शेतकऱ्यांनी विकत पाणी घेऊन आज उद्या पाऊस पडेल या आशेवर कांद्याची रोपे जतन केली होती. आणि मध्यंतरी पूर्वाच्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
झाल्या होत्या. नद्यांना पूरपाणी आल्याने भूर्गभातील पाण्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. (वार्ताहर)